युवाशक्ती ही जागृत ऊर्जा असून ते निरंतर प्रवाही असणे आवश्यक असते – डॉ. एस. एच. शाक्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- ‘एखाद्या देशाचे आगामी भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीच्या हाती असते. युवाशक्ती ही जागृत ऊर्जा असून ते निरंतर प्रवाही असणे आवश्यक आहे. तरुणांच्या हातून घडणारे प्रत्येक चांगले अथवा वाईट काम हे देशाचे भवितव्य बनवत असते. म्हणून त्यांच्यावर चांगले संस्कार करणे समाजाचे प्रमुख कर्तव्य आहे, अशा शब्दांत, विदर्भ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांनी सदर महाविद्यालयातील इतिहास विभाग, मराठी विभाग आणि समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “देश उभारणीत युवकांचे स्थान व महत्त्व” या विषयावर आयोजित ‘ एक दिवसीय परिषदेत’ अध्यक्ष या नात्याने बोलत होत्या.
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘राष्ट्र उभारणीमध्ये युवकांच्या योगदानांची आणि राष्ट्र घडवण्यामध्ये युवकांचे स्थान व महत्त्व’ या विषयावर साधक-बाधक प्रकाश टाकला जावा, हा उद्देश समोर ठेऊन सदर एक दिवसीय परिषदेचे आयोजन आणि नियोजन प्रा. गजानन राऊत, प्रा. गंगाधर लांडगे आणि डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी संयुक्तरीत्या केले. या परिषदेचे उद्घाटक म्हणून प्रा. राऊत यांनी ‘देशाच्या विकासाच्या वाटचालीची दिशा ही युवकांच्या कामगिरीवर निश्चित होत असते’ असे प्रतिपादन केले तर या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीकांत पानघाटे यांनी, ‘ कठोर परिश्रम, उच्च विचार आणि दांडगा निश्चय’ या त्री सुत्रीचे पालन ध्येय गाठताना विद्यार्थ्यानी करावे,असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या परिषदेला लाभला. या परिषदेचे संचालन प्रा. लक्ष्मन मंगाम, तर या परिषदेचे प्रास्ताविक प्रा. गंगाधर लांडगे तर या परिषदेची सांगता कु. आरती सूर्यवंशी यांनी केली. ही परिषद यशस्वी होण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.