चांदा पब्लिक स्कूल येथे अभंगवाणी स्पर्धेचे आयोजन
चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. संत कवींनी मराठी भाषेतून अभंग, ओव्या रचून तर मराठी लेखक व साहित्यकारांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेला समृध्द केले. प्रसिध्द कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे कुसूमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधुन चांदा पब्लिक स्कूल येथे ‘अभंगवाणी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
चांदा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात पालखीसोबत पाहुण्यांचे आगमन होताच टाळ, मृदुंग व अभंगाने वातावरण अगदी भक्तीमय होऊन गेले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सौ. योगिनी देगमवार, सौ. ऐश्वर्या भालेराव व शाळेच्या संचालिका तसेच मुख्याध्यापिका यांनी ज्ञानेश्वरी पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
शाळेतील विद्यार्थ्यांनी संतांची वेशभुषा करून त्यांची शिकवण देणारे अभंग गावुन दाखवले. त्यात कश्याप्रकारे ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे तर संत तुकाराम यांनी कळस उभारण्याचे व संत एकनाथ, समर्थ रामदास, गाडगे महाराज, गोरा कुंभार, संत मुक्ताबाई, संत मिराबाई, संत जनाबाई यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले ते विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रसिध्द वचनांतून गावून दाखविले.
मुलांच्या अभंग पठणाने तसेच वेशभुषेने, भारावुन गेलेल्या अतिथींनी तसेच शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी मुलांना मराठी संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा व त्याचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आम्रपाली पडोळे यांनी समाजाला घडविण्याच्या कार्यात भावी विद्यार्थ्यांची भुमिका काय असावी यावर मार्गदर्शन केले. तसेच नाट्यछटेकरिता मार्गदर्शन करणारे श्री. जगदिश नंदुरकर यांना सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सौ. मनिषा नागोशे, विद्यार्थी विर बल्की व पवित्रा उगेमुगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली