जिवती नगरपंचायतीची घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीसाठी नागरिकांना नोटिस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती नगरपंचायतीची स्थापना १७ जून २०१५ ला झाली, आता याच अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भाग असलेल्या नगरपंचायतीचे सध्याचे कामकाज विस्कळीत सुरू असल्याचे दिसत आहे. त्याचे कारण असे की थकबाकी वसुलीसाठी नगरपंचायतीने पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम राबवून सर्वसामान्य जनतेला नोटिसा काढल्यामुळे नागरिकांच्या रोषाला नगरपंचायत पदाधिकार्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या जिवती शहरात दिसू लागले आहे.
नगरपंचायतीकडून शहरातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना तसेच व्यवसाय करणार्या दुकानदारांना त्यांच्याकडे असणारे कर, पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती कर या थकबाकीच्या नोटिसा काढल्या आहेत. त्यांनी ही थकबाकी भरावी, असे फर्मान काढले आहे. शहरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना नगरपंचायतीकडून अशी पठाणी वसुलीच्या नोटिसा काढल्यामुळे नागरिकांना एक प्रकारे मोठा धक्का बसला आहे.अशा नोटिसा देणार्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी या काढलेल्या नोटिशीमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे सध्या तरी शहरात दिसू लागले आहे. यात अनेक प्रश्न निर्माण झाले असून नगरपंचायतीकडून अशी नोटीस काढण्याची तरतूद आहे का? असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे.
नियमाप्रमाणे नगरपंचायतीच्या कर्मचार्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी फिरून घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करणे गरजेचे असताना कार्यालयामध्येच बसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला नोटिसा काढणे कितपत योग्य आहे,असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे.