शासकीय खनिकर्म विभागाचे ट्रकद्वारा अवैद्य रेतीची वाहतूक
पंचनामा नंतर तिथेच ठेवलेला ट्रक चालकने केला पसार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती : शासकीय खनिकर्म विभागाचे ट्रक द्वारा आणलेली अवैध रेती खाली करीत असताना काही जागरूक नागरिकांनी त्याची माहिती तहसीलदार यांना दिली.त्वरित महसूल विभागाचे गस्त पथक तिथे आले. पंचनामा करून ट्रक जप्त न करता तिथेच ठेवला. नंतर तो ट्रक चालकांने तिथून पसार केला. याबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता जिल्हा खनीकर्म अधिकारी कारवाई करेल असे सांगितले.
दि.१८ मे च्या पहाटे १:२५ वाजता एकता नगर येथे एका घरासमोर एमएच ३१ एफसी ३१४४ या क्रमांकाचा डीजीएम नागपूर चे ट्रक द्वारा अवैधरीत्या आणलेली रेती काही मजुराद्वारे खाली करीत असताना स्थानिक नागरिकांनी पाहिले. तेव्हाच त्या घटनेची माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिली. त्यांनी गस्तीवर असलेल्या पथकांना तिथे पाठविले.गस्त पथकाचे सामोरच ट्रकमधील रेती खाली केल्या जात होता. पंचनामा करून तो ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात न नेता तिथेच ठेवला आणि पथक निघून गेले. त्यानंतर चालकाने ट्रक तिथून पसार केला. महसूल पथकात नायब तहसीलदार मनोज आकनुवार आणि इतर कर्मचारी होते. घटनेच्या वेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आपल्या भ्रमणध्वनी द्वारे संपूर्ण घटनेची चित्रफीत काढली. याबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता जिल्हा खणीकर्म अधिकारी नैताम यांना याची माहिती दिली आहे. तेच कारवाई करेल असे सांगितले.
या तालुक्यात कचराळा,जेना, चंदनखेडा, पाटाळा,पारोधी,पिपरी, कोंढा, चारगाव, मुधोली, कोकेवाडा, राळेगाव हे ११ प्रमुख रेती घाट आहेत.यासह येथे इतर अनेक छोटे घाट आहेत. राळेगाव हा वर्धा नदीवरील घाट वगळता इतर घाटांचा लिलाव झालाच नाही. मात्र जेसीबी, हायवा,ट्रक, टीप्पर द्वारा दिवस-रात्र या घाटातील रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. कारवाईच्या नावावर एखादा ट्रॅक्टर वरती कारवाई करण्यात येते.रेती द्वारा शासनाला मिळणारा कोट्यावधीचा महसूल येथील अधिकारीवर्ग व रेती माफियांच्या संगनमतांनी बुडत आहे.यात अधिकारी आर्थिक दृष्ट्या गब्बर तर शासन कंगाल होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.
१८ मे ची कारवाई आणि तालुक्यात होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील अवैध रेती तस्करीत लिप्त स्थानिक अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या निलंबनाची मागणी शिवसेना शिंदे गटाचे सुरज शहा यांनी तहसीलदार मार्फत निवेदन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
या प्रकरणाचा पंचनामा केला मात्र ट्रक मध्ये रेती नसल्याने जप्त करण्याचा आम्हास अधिकार नाही. त्यामुळे ट्रक आम्ही जप्त करून तहसील कार्यालयात लावला नाही. यावर पुढील कारवाई जिल्हा खणीकर्म अधिकारी करेल.
मनोज आकनुवार नायब तहसीलदार तथा पथक प्रमुख
रेती घाटाचे लिलाव सुरू असल्याने मी व्यस्त आहे. त्यामुळे आता माहिती देऊ शकत नाही. माझ्या कार्यालयात कुणालाही पाठवा त्यांच्या जवळ संपूर्ण माहिती देतो.
नैताम जिल्हा खानिकर्म अधिकारी, चंद्रपूर