ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘नरकातला स्वर्ग’ हुकूमशाहीविरुद्ध संघर्षाची यशोगाथा’ पुस्तक वितरित करुन प्रस्थापित जुलमी व्यवस्थेविरोधात जागृती

शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचे अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      जुलमी सत्तेच्या अन्यायकारक कारवायांपुढे न झुकता, अपार हिमतीने लढा देणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी प्रेरणादायी वास्तविकता समाजासमोर मांडली आहे. या पुस्तकाचे नुकतेच मुंबई येथे मोठ्या उत्साहात प्रकाशन पार पडले. आता हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे.

या पुस्तकाच्या हजारावर प्रति बोलावून चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंता, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय पदाधिकारी व मान्यवर आदींना वितरीत करण्याचे अभियान शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे राबवीत आहेत.

हे पुस्तक केवळ शब्दांचे संकलन नसून, ते संघर्षाचा आणि सत्यासाठीच्या लढ्याचा एक दस्तावेज आहे. तुरुंगात असताना शिवसेना नेते तथा खासदार राऊत यांनी अतिशय धैर्याने आणि शांततेने या पुस्तकाचे लेखन केले. चुकीच्या आरोपांखाली त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, पण त्यांनी कधीही अन्यायासमोर आपली मान झुकवली नाही. जुलमी सत्तेने त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सत्याला जगासमोर आणले.

या पुस्तकात त्यांना तुरुंगात असताना सातत्याने भेटणाऱ्या महाराष्ट्रातील त्यांच्या निवडक निकटवर्तीयांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूरचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचाही उल्लेख करण्यात आला आहे, हे विशेष.

‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक विशेषतः युवा पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ, परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्यासाठीचा लढा न सोडण्याचं बळ यातून शिकता येते.

आजही जनतेचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे आणि खा. संजय राऊत यांच्या संघर्षाने तो अधिक दृढ झाला आहे. त्यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, हीच आजच्या पिढीसाठी खरी आदर्श शिदोरी आहे. हे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचावं, आत्मसात करावं आणि आपल्यातल्या लढवय्या वृत्तीला जागं करावं, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी या अभियानाच्या निमित्ताने मांडले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये