खासदार प्रतिभाताई धानोरकरांचे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल
खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनी अधिग्रहित करण्याची ठाम मागणी

चांदा ब्लास्ट
नागपूर येथे वेकोली व्यवस्थापनासोबत बैठक संपन्न
चंद्रपूर – वणी क्षेत्रातील गाडेगाव, खैरगाव, टाकळी, चिखली आणि सोनुर्ली या गावांमधील शेतकऱ्यांची जमीन पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, खुल्या प्रवर्गातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी अद्याप अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या नाहीत.
यामुळे भविष्यात त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच त्यांना आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे (वेकोली) व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी यांच्याशी नागपूर येथे बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, निदेशक (कार्मिक) हेमंत पांडे, जी.एम. (आयआर), जी.एम. (भुराजस्व) तसेच संबंधित भूधारक शेतकरी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान खासदार धानोरकर यांनी लेखी मागणी सादर करत स्पष्ट केले की, वणी क्षेत्रातील उखणी खंड क्र. 1 ची जमीन नीलजई डीप विस्तार प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यासंदर्भात चर्चा झाली असून, पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने वरील गावांतील खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनीही तातडीने अधिग्रहित करण्यास परवानगी देण्यात यावी.
खासदार धानोरकर म्हणाल्या, “स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात.”
या बैठकीत वेकोली कामगारांच्या पदस्थापना, रोजगार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. वेकोलीच्या व्यवस्थापनाने या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.