मुलीच्या फाजीलपणामुळे होणारी वाताहत दर्शविणारी: ‘ वा! दिवा लावला पोरीनं’ _ प्रा. राजकुमार मुसणे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- जय बजरंगबली नाट्य दंडार कलाकृती चेक बेरडी ता. गोंडपिपरी या मंडळाचा ६९ वा प्रयोग जय बजरंगबली नाट्यकला मंडळ गुंजेवाही, ता. सिंदेवाही अरुणजी गांडलेवार व त्यांच्या चमूच्या सौजन्याने
राजू सुरकर निर्मित,स्वरबहा परमानंद मानकर दिग्दर्शित,प्रदीप धंदरे लिखित ‘ वा! दिवा लावला पोरीनं’ अर्थात’ लेक लाडकी बापाची ‘या दंडारीचा प्रयोग यशस्वीरित्या संपन्न झाला. जिवापाड प्रेम करणाऱ्या लाडक्या मुलीच्या फाजीलपणामुळे होणारी वाताहत,लाडाच्या अट्टहासाचा, तिच्या स्वैर वर्तनाचा विषय या दंडारीतून मांडलेला आहे.
जय बजरंग बली नाट्य दंडार कलाकृती चेकबेरडी ता. गोंडपिंपरी ,जि. चंद्रपूर हे मंडळ मागील तीस वर्षापासून सातत्याने दंडारीचे विविध प्रयोग करीत असतात. कवडू धंदरे, श्रीरंग धंदरे आणि आता प्रदीप धंदरे अशा तीन पिढ्या नाट्यक्षेत्रात दंडारीच्या माध्यमातून सर्वसामान्य रसिकांचे रंजन व प्रबोधन करीत आहेत. या दंडार मंडळाचे यावर्षी सत्तरपेक्षाही अधिक प्रयोग झाले आहेत. पूर्वापार चालत आलेल्या दंडारी प्रमाणेच परंतु आधुनिक झाडीपट्टी नाटकाशी सुसंगत अशा दोन्हीच्या समन्वयातून सादर केलेले’ वा ! दिवा लावला पोरीनं ‘हे दंडार कम नाटक आहे.
रघुनाथ पाटील यांना उमेश व लता ही दोन मुले पत्नीच्या निधनानंतर दोन्ही मुलांना त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे प्रचंड लाडाने जपलेले. ऐश्वर्यसंपन्नतेमुळे व वडीलाच्या काळजीवाहूपणामुळे मुले लाडावलेली. फायनल चे शिक्षण घेणारे मुलगी मात्र घरातील नोकरावर प्रेम करते. हरकंडे मामा बाळू व लताच्या विसंगत प्रेमाला साथ देतात. वाढत चाललेल्या मुलीच्या वयामुळे लग्नाची चिंता असणे रघुनाथराव पाटील ‘मुलीवर विश्वास आहे पण अंधविश्वास नको, सध्याची एकूण परिस्थिती पाहता काळ बरोबर नाही’भान ठेवत विचार करून भाच्यालाच मुलगी देण्याचा निर्धार करतात. बाळूवर प्रेम करणाऱ्या लताला मात्र हे लग्न मान्य नसते.
रघुनाथराव पाटील यांची बहीण ही गरीब कुटुंबातली आहे. मोळी विकत आणून कष्टाने, संघर्षाने संसार उभी करते. तिला एक मुलगा दिलीप व संगीता मुलगी आहे. अचानक घरी आलेला भाऊ पाहून बहिणीला आश्चर्य वाटते. पती दवाखान्यात भरती असताना मरणाला न येणारा भाऊ घरी आल्याचे पाहून अचंबित होते. भावाने लग्नाविषयी बोलताच तिला धक्का बसतो. भाचाही शेती पिकत नाही, खर्च खूप होतो त्या बदल्यामध्ये उत्पन्न फारसे होत नाही, शिवाय मोठी बहीण लग्नाची आहे .मला लग्न करणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगतो . परंतु मामाचा दबाव वाढताक्षणी मात्र पाच लाखाची मागणी करतो.
रघुनाथराव सर्व अटीसह साटेलोटे पद्धतीच्या लग्नास तयार होतात. उमाला भावासमोर लाचार झाल्याचे दुःख होते. ती दिलीपला खडसावते. दोन्ही लग्न यशवंतराव करून देतात .प्रेयसीच्या वियोगाचे दुःख बाळूला असह्य होते,तो शेतामध्ये राहायला जातो. इकडे लतालाही प्रियकराला सोडून आल्याने संसारात मन रमत नाही. उलट ती श्रीमंत घराण्याची मुलगी असल्याचा ताव कुटुंबीयांवर मारते . पदोपदी त्यांचा अपमान करते,पतीला डबा देत नाही,डब्यात शिळे अन्न देते, मन मारून उद्विग्नपणे जगणाऱ्या लताला जीव किटकिटल्यासारखे , गुदमरल्यासारखे वाटायला लागतं. बाळूसोबतची झालेली ताटातुटीमुळे बेचैन होणारी लता कुटुंबातील सर्वांचे हाल करते. कामासाठी बाळूला बोलावले जाते. बाळू बॅग व सबल घेऊन येतो. बाळूशी असलेली लताची लगट कुटुंबीयांना खटकते. सासूशी वारंवार खटके उडत असल्यामुळे तिचा छळ करून लता सासूलाच मारून टाकते अन घर सोडून माहेरी जाते आणि संघर्ष वाढतो.
आपल्या मुलीला बहिणीच्या घरच्या घरी होणारा त्रास रघुनाथराव यांना खटकतो . लताचं सगळं बोलणं ऐकून रघुनाथराव संतापतात.’चुकीला माफी नाही शहानिशा करून गुन्हेगारांना शिक्षा नक्की मिळेल. लता आणि संगीता यांच्यातही वाद होतो लताचे प्रेम संगीताच्या लक्षात येताच ती तिला खडसावते अहंकारी लता मात्र संगीताची गरीब म्हणून निर्भत्सना करते. संगीता व उमेश यांच्या संसार वेलीवर बहरलेल्या फुल म्हणजेच मुलाला बाळ जन्माला येते.बाळू हा उमेशला ग्रामपंचायत मध्ये बोलावल्याचे सांगून उमेश घराबाहेर गेल्यावर व संगीता पाणी आणायला गेल्यावर संधी साधून हरकंडे मामा, बाळू, लता संगनमताने बाळाला विष देतात. धनाच्या आलेल्या एक लाखाची चोरी करतात. मामाला अर्धा हिस्सा हवा असतो,हिस्से वाटणीवरून वाद होतो लता आणि बाळू हरकांडे मामाला मारतात तो कसा बसा वाचतो. हरकंडे मामाचा राग अनावर होतो तो उमेशला जाऊन हकीकत सांगतो. हे रघुनाथराव जेव्हा एकतात तेव्हा प्रचंड संतापतात आणि संतापलेले अवस्थेत चिडून लताला हातात सुरा देऊन बाळाचा जीव घेण्यास सांगतात. रघुनाथराव त्याच सुराने हरकंडे मामाचाही जीव घेतात.
शेवटी मुलीला संपवून हताशपणे रघुनाथराव आत्महत्या करतात.मरतानासुद्धा रघुनाथराव पाटील यांचे मुलीबद्दलचे प्रेम,माया वाखण्यासारखीच. ते..तडफडत सरपटत लाडक्या मुलीजवळ जाऊन मुलीचा मुका घेत रघुनाथराव प्राण सोडतात. हा प्रसंग डोळे पाणावणारा.मुलीवरील आंधळ्या प्रेमाने घडलेले हे सूड नाट्य प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे आहे. मुलीवरील आंधळ्या प्रेमापोटी घडलेल्या या सर्व नाट्यातून प्रेक्षक बोध घेतात.
‘वा ,दिवा लावला पोरीन’या दंडारीतील गीतेही श्रवणीय व नाट्याशय वाहक आहेत. ‘व्यथा सांगू कशी रे माणसा व्यथा सांगू कशी, तळमळते आज रडते माझ्या लेकराची माय’आहे न माझे भाग्य थोर मी श्रीमंताची ही पोर’पोरीचा बघून घ्या नवा नवा नखरा’, बाबा माझ्या लग्नाची तुम्हास पडली घाई’, आई तुझ्या मूर्ति वाणी जगात मूर्ति नाही अनमोल जन्म दिला उपकार फिटणार नाही’, नका होऊ नाराज’, नको करू वाईट चाळे मिठीत ये ना जरा पडला बोजा संसाराचा सोडूनी जाता अश्रू गळू लागले तुटले भावबंध तुटले तुझे नाते जा सुखाने संसार करतो कशी झाली रे ताटातूट सजने तुझ्याच साठी आले नभात रंग मन धुंद धुंद झाले सखे तुझ्या इश्कात ग ये बाळ्या ये लवकर ये नाही करमत या घरात’, सोडून गेली आई तुझ्या लेकराला ‘,व काय सांगू बाबा तुम्हाला’, ‘बाळा झोप ना हलविते पाळणा ‘,’फुटले फुटले कर्म ‘,या काळीज माझे काढू नका रे ,’झाला गुन्हा काय रे ‘,दादा माफ कर ‘यासारख्या वैविध्यपूर्ण बहारदार गीतांनी व ढोलकी, तबला, ऑक्टोपॅड, ऑर्गन, झिलकरी टाळ यांच्या संगीतसाथीने नाट्यप्रयोगात चांगलीच रंगत आणली.खरे तर दंडारीचा आत्माच गीते आहेत.
नाट्याशय प्रामुख्याने गीतातूनच व्यक्त होतो. शिवाय स्वरबहार परमानंद मानकर यांची सुश्राव्य गीते व सुमधुर सुराने प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.तबला अभिषेक बद्दलवार,ढोलकी पवन ढोडरे,ऑर्गन निखिल दुर्गे,पॅड रिंकू कुक्कुडकर सहकारी भगवान मेदाळे,विजय मडावी यांच्या संगीत साथीमुळे व प्रसंगात साजेशी नेपथ्य भोयर सा. स.आरमोरी यांचेमुळे प्रयोगात रंगत आली.
सर्वसामान्य प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन करणारी दंडार ही रात्रभर सुरू असते त्यामुळे प्रेक्षक हा दंडारीत बसून राहिला पाहिजे यासाठी विनोदी प्रवेशाची रचना जाणीवपूर्वक दंडारीत केली जाते.हरकंडे मामा व बाळू नोकर यांच्या संवादातून विनोद निर्मिती केली जाते. एक मोबाईल दोन सिम, एक मोटर दोन डीपी, दात पिकून केस हलत आहे, ट्रांसफार्मर , बोंदा भरा, झोंबूनच पडता, झरर्रा, तपन जास्त ऊन कमी, ढेमशाचे वडे, कवचकुटी ,मिरची डब्बा अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दोच्चारातून हास्योत्पादक प्रसंग निर्माण करून विनोद साधला जातो. हरकंडे मामा म्हणतो,’ मी तुम्हाला सांगतो मनाचा तर दिवसच निघून जाय’अशा पंचने व विनोदाने प्रेक्षक लोटपोट होतात अन दंडार रात्रभर पाहतात.
बालपणी झालेल्याआईच्या निधनानंतर वडिलांनी लताचा प्रेमाने सांभाळ केला. फायनल पर्यंत शिक्षण घेतलेली लाडात वाढलेली मुलगी अति लाडाने शेफारते, मनमानीपणे वर्तन करते, हट्टीपणाबाई कुटुंब विस्कळीत करते, आंधळ्या प्रेमाने आणि हरकांडे मामाच्या कटात सामील होऊन जीवन उध्वस्त करते. हे दंडारीतून उत्तमरीत्या दर्शविले आहे.
रघुनाथ पाटील (दिनकर सोनटक्के),हरकंड्या मामा.(प्रदीप धंदरे),दिलीप (प्रेमदासं घोडे),उमेश (राजू सुरकर),बाळ्या (नितीन दहेलकर),उमाबाई.(लता निंदेकर),लता (अंकित मेश्राम),संगीता.(अंकुश लोणारे) या सर्वच कलावंतांनी कसदार अभिनयाद्वारे दंडारीतला विषय लोकापर्यंत ताकदीने पोहोचविला. उत्तम पाठांतर, गतिमानता, सुश्राव्य गीते, पोट धरून हसायला लावणारा विनोद विचार प्रवृत्त करणारे संवाद यामुळेया दंडरीचा प्रयोगअप्रतिम झाला.
वडिलांचे प्रेम, फाजील लाड,पोरकेपणा, तडजोड ,दारिद्र्याशी संघर्ष, धडपड,दबावतंत्र, श्रीमंतीचा माज, मुलीची शिक्षणाची धडपड,वडिलांना लग्नाची चिंता,लग्नाविषयी फुगवून सांगितलेला पगार आणि वास्तविकता, फसगत, लालच, मित्रांसोबत पार्टीत भाऊ वाया जाऊ नये म्हणून सजग करणारी बहीण, कटकारस्थान, विसंगत प्रेम असे विविध विषय दंडारीतून हाताळले आहेत.रघुनाथरावांचा करारीपणा,उमेश – संगीता यांचा प्रणय व सफल संसार,बाळू- लताचे प्रेम, उमाचा संघर्ष, दिलीपचा व्यवहारीपणा, कपटी हरकंडे मामाची खलनायक प्रवृत्ती, लताने सासरच्यांचा केलेला छळ,, हरकांडे – बाळू यांचा विनोद अनुभवण्यासाठी ही दंडार पाहायलाच हवी.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली
( नाट्यदंडारसाठी संपर्क.
राजू सुरकर :- 7798691191 )