ग्रामीण भागातील विद्युत रोहित्राच्या क्षमतेत वाढ करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) ची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुक्यात ग्रामीण भागात 63 के. व्ही. ए. क्षमतेच्या रोहीत्रावर अनेक कृषीपंप जोडलेले असल्याने अतिरिक्त भार पडून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावठाणच्या 63 के. व्ही. ए. क्षमतेच्या रोहित्रांची क्षमतेत वाढ करून ती 100 के. व्ही. ए. करण्यात यावी, अशी मागणी महावितरण चे उपकार्यकारी अभियंता शेटे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामीण भागात गावठाणच्या एकाच रोहीत्रावर अनेक कृषी पंप जोडलेले आहे. रोहित्राची क्षमता कमी असल्याने वारंवार रोहित्रामध्ये बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतीला पाणी देण्यास अडचणी निर्माण होत आहे. मुळात शेती पंपाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जातो. त्यात कमी क्षमतेच्या रोहित्रामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी जास्त क्षमतेचे रोहित्र बसवल्यास विजेच्या वोल्टेज मध्ये सुधारणा होईल.
वारंवार खंडित होणारा वीस पुरवठा सुरळीत करणे शक्य होईल. तसेच शेतकऱ्यांच्या नेहमी येणाऱ्या विजेच्या तक्रारी व समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल.त्यामुळे गावठाणाच्या 63 के. व्ही. ए. क्षमतेच्या रोहित्रांच्या क्षमतेत वाढ करून ती 100 के. व्ही. ए क्षमतेची करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, राजु सिरसाट,युवक अध्यक्ष अभिनव खांडेभराड,अशोक खार्डे, संतोष राजे जाधव,आदींनी केली आहे.