ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना आपल्यात परोपकाराची भावना रुजवते – डॉ. भगवान खरात

श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रा.से.यो. शिबिराचे उद्घाटन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जीवनात प्रगती करायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा कारण आपले भविष्य हे हातांच्या रेषांवर ठरत नसून मनगटाच्या बळावर घडत असते तसेच राष्ट्रीय सेवा योजना आपल्यात परोपकाराची भावना रूजवते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. भगवान खरात यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन समारोह प्रसंगी उद्घाटक म्हणून ते सावखेड भोई येथे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अतिथी म्हणून क्षेत्रीय समन्वयक डॉ. विनोद बन्सीले, ग्राम पंचायत सदस्य महेंद्र जाधव यांची उपस्थिती होती. समारोहासाठी अध्यक्ष म्हणून ग्रंथपाल डॉ. उमेश देशमुख उपस्थित होते.

सावखेड भोई येथे महाविद्यालयाच्या वतीने एन एस एस चे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना डॉ. खरात यांनी आपण आत्मकेंद्री न राहता समाजाभिमुख व्हावे, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित डॉ. बन्सीले यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. उमेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांना रासेयो चे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी श्रमदानासोबतच बौद्धिक व सांस्कृतिक विकास घडावा यासाठी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरामध्ये युवा भारत, विकसित भारत, सशक्त भारत या थीम अंतर्गत श्रमदान, बौद्धिक सत्र, सांस्कृतिक व जनजगृतीपर कार्यक्रम यासह विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन कु. माधवी खैरे हिने केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र साळवे यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. मधुकर जाधव यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती ढोकले यांनी मानले.

या शिबिराच्या उद्घाटन समारोहासाठी सावखेड भोई मधील ग्रामपंचायत सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक, स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये