राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबवणार – शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची माहिती
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची मंत्रालय भेट
चांदा ब्लास्ट
राज्यात प्राथमिक शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत याचा परिणाम विद्यार्थी गुणवत्तेवर होत आहे करिता महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर राज्य कार्यकारिणी सभेत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असा ठराव पारित करण्यात आला त्याअनुषंगाने संघटनेच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण विभागाचे राज्याचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन सदर मागणी मांडली.
संघटनेचे राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, रायगड जिल्हाध्यक्ष वसंत मोकल, कार्याध्यक्ष विश्वास ठाकुर, कोषाध्यक्ष सुनील देशमुख, सल्लागार दयानंद मोकल यांनी प्रधान सचिव साहेबांच्या घेतलेल्या भेटीत राज्यात लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया राबवणार अशी माहिती दिली. यासह प्राथमिक शिक्षक विद्यार्थी व पालकांच्या विविध 43 समस्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, डीसीपीएस चा हिशोब देणे, वेतन दरमहा 1 तारखेला करणे, वेतनेतर निधी तरतूद करणे, उच्च प्राथमिक शाळेत किमान 3 विषय शिक्षक मंजूर करणे, उपस्थिती भत्ता वाढवणे, गणवेश योजना स्थानिक स्तरावर राबवणे, चंद्रपूर व अन्य जिल्ह्यात एकस्तर वेतनश्रेणीचे लाभ कायम ठेवणे, जिल्हा राज्य पुरस्कार वेतनश्रेणी कायम ठेवणे, 10-20-30 योजना लागू करणे, 30 जून से.नी जुलै वेतनवाढ, प्रलंबित पदोन्नती, विषय शिक्षक समान वेतनश्रेणी, बदली सुधारणा, सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित क्लेम, सेवनिवृत्तीचे वय 58 वर्षच ठेवावे, शालेय अनुदान वाढवावे, शाळेला सर्व भौतिक सुविधा पुरवाव्या,पोषण आहाराचा दर्जा सुधारणे, लाईटबिलांसाठी निधी देणे, केंद्रात लिपिकाची नियुक्ती करणे, निवडश्रेणीसाठी टक्केवारीची अट वगळणे, केंद्रप्रमुख परीक्षेसाठी वयाची अट कमी करणे, सर्वच पदोन्नत्या जि प शिक्षकांमधून करणे, नपा मनपा शिक्षकांच्या वेतनासाठी 100% अनुदान देणे, एमएससीआयटी साठी मुदतवाढ देणे, शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणामध्ये फी सवलत देणे, वेतन आयोग हप्ते अदा करणे इत्यादी समस्यांचा समावेश आहे निवेदनाच्या प्रती मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच ग्रामविकास विभागाला सुद्धा देण्यात आल्या. तसेच मा.शालेय शिक्षण मंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मा.खांडेकर साहेब यांची भेट घेऊन शिक्षण विभागातील प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली.