ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक – आमदार सुभाष धोटे.

राजुरा येथे तालुक्यातील स्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       संतुलित आणि सकस आहारामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. स्थानिक परिसरातील, जंगल, शेतशिवारातील आढळून येणाऱ्या विविध आरोग्यदायी रानभाज्या, रानफळे यांची माहिती व उपयुक्तता नागरिकांना होणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शनी आणि महोत्सवाच्या आयोजनामुळे नागरिकांना रानभाज्यांची ओळख होते, त्यांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होते. या महोत्सवाला तालुक्यातील नागरिकांनी भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले. ते तहसील कार्यालय राजुरा येथील सभागृहात तालुका कृषी विभागा द्वारा सकाळी ११ वाजता आयोजित तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

         या प्रसंगी उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसिलदार ओमप्रकाश गौड, उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी रवींद्र चव्हान, राजुरा काँग्रेसचे अध्यक्ष रंजन लांडे, शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष तिरुपती इंदुरीवार, व्यवस्थापक अंबुजा सिमेंट फॉउनडेशन चे श्रीकांत कुंभारे, कृषी विद्यापीठातील ज्योती ढोंगळे, शेतकरी मारोती लोहे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

          या रानभाजी महोत्सवात रागिणी स्वयं. सहाय्यता समूह वरूर रोड, निसर्ग शेतकरी महिला गट पंचाळा, भाग्यविधाता महिला ग्राम संघ पंचाळा, जय दुर्गा महिला बचत गट, अंबुजा फाऊंडेशन उपरवाही व तालुक्यातील इतर सहभागी महिला व शेतकरी वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी होऊन करटोली / काटवल, टाकळा /तरोटा, शेवगा, अळू, धोपा, केना, बांबू, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, अंबाडी, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर, गुळवेल, कडुभाजी यासह विविध आरोग्यदायी रानभाज्या या महोत्सवात प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यावेळी सर्व सहभागी बचत गटांना आ. धोटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महोत्सवात राजुरा तालुक्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये