
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना – पैनगंगा वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे कोरपना तालुक्यातील नदीपट्ट्यातील अनेक गावातील शेत पिके बुडाली. परिणामी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे.
पुरामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार मोड होऊन पिकांना सावरावे लागले. यातच आता कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेत पिके अडचणीत आली आहे. आधीच आर्थिक विवंचनेत असलेला शेतकरी निसर्गाच्या या दृष्टचक्रामुळे पूर्णता बेजार झाला आहे. तालुक्यातील भोयगाव, भारोसा , एकोडी , इरई , अंतरगाव , वनोजा, सांगोडा , कारवाई , कोडशी बूज , कोडशी खुर्द, पिंपरी , परसोडा, पारडी , रायपूर , जेवरा, तुळशी, गांधीनगर या नदीलगतच्या गावात महिन्यापूर्वी पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले.
परंतु अध्याप पावेतो पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकऱ्यात नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अंतरगाव चे माजी सरपंच आशिष मुसळे यांनी केली आहे.



