गौरी विसर्जनासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांचा हल्ला
सावलीच्या गाव तलावातील घटना ; जीव वाचविण्यासाठी महिलांची धावपळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
गौरी विसर्जनासाठी सावली येथील गाव तलावावर गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात आठ महिला जखमी झाल्या असून, वर्षा सुरेश कोसरे, छाया संजय कोसरे, रुपाली सत्यवान कोसरे, शीतल अनिकेत कोसरे यांच्यासह अन्य महिलांचा समावेश आहे.
गौरी विसर्जनासाठी गाव तलाव परिसरात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तलावाच्या पाळीवर असलेल्या वडाच्या झाडावर मधमाश्यांचे मोठे मोहळ होते. अचानक या मोहळातून मधमाश्या बाहेर पडल्या आणि उपस्थित महिलांवर हल्ला चढविला. मधमाश्यांचा अचानक हल्ला झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
मधमाश्यांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी सैरावैरा धावत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत काही महिलांना मधमाश्यांनी डंख मारल्याने त्या जखमी झाल्या. जखमी महिलांवर स्थानिक पातळीवर उपचार करण्यात आले.
दरम्यान, या घटनेत रुपाली सत्यवान कोसरे यांचा सोन्याचा दागिना हरवल्याची माहिती आहे. हल्ल्यामुळे झालेल्या गोंधळात दागियूना नेमका कुठे पडला, याचा शोध घेतला जात आहे.
गौरी विसर्जनासाठी मोठ्या संख्येने महिला तलाव परिसरात येत असताना मधमाश्यांचे मोहळ असलेल्या झाडाबाबत संबंधित यंत्रणेने खबरदारी घेणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



