राज्यातील सर्वात मोठे पुरातन शिवलिंगाला मिळाले भव्य मंदिररूपी छत्र
आ. जोरगेवार यांच्या पुढाकारातून लालपेठच्या पुरातन महाशिवलिंगाचा जीर्णोद्धार ; अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात धार्मिक सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पुरातन महाशिवलिंगाच्या भव्य जीर्णोद्धार निमित्त आयोजित धार्मिक सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या धार्मिक सोहळ्याने या ऐतिहासिक शिवस्थानाच्या वैभवात आणखी भर पडली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि स्वखर्चातून साकारलेल्या मंदिरामुळे तब्बल ४०० हून अधिक वर्षे उघड्यावर असलेल्या महादेवाला आता भव्य मंदिररूपी छत्र मिळाले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी, आयुक्त मनपा अकुनूरी नरेश, वेकोली व्यवस्थापक संजीवसिंग रेड्डी, मंदिर समिती अध्यक्ष शंकर बल्लेपवार, सचिव किशोर रायपूरकर, चंद्रपूर महानगर जिल्हा प्रभारी अर्चना डेहनकर, मनपा महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिर्हे, मनपा गटनेता चंद्रशेखर शेट्टी, नगराध्यक्ष नीलेश ताजने, जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तुषार सोम, उपाध्यक्ष बलराम डोडानी, महामंत्री रवींद्र गुरनुले, सविता दंढारे, मनोज पाल, नामदेव डाहुले, श्याम कनकम, विधानसभा प्रमुख दशरथसिंह ठाकूर, महिला मोर्चा प्रभारी वंदना हातगावकर, वेदांती करन देवतळे,गटनेता मीना मोरपाका, महिला शहर अध्यक्षा सूचित लुटे, नगरसेवक लखणसिंग चंदेल, संजय कंचर्लावार, जितेश कुळमेथे, नितेश गवळे, रॉबिन बिश्वास, भालचंद्र दानव, आशिष मासिरकर, निरीक्षण तांड्रा, नगरसेविका सविता कांबळे, शीतल गुरनुले, पुष्पा उराडे, राजलक्ष्मी कारंगल, सरला कुळसंगे, अनुजा तायडे, आशा देशमुख, ज्योती जीवने, डीलन केळझरकर, करिष्मा जंगम, अनिता चौके, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, प्रदीप किरमे, रवी जोगी, सारिका संदूरकर, सुभाष आदमने, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे पुरातन महाशिवलिंग चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाची जिवंत साक्ष मानले जाते. मात्र अनेक वर्षे हे शिवलिंग ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत उघड्यावर होते. या प्राचीन शिवस्थानाचे महत्त्व लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी मागील श्रावणात मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला. मागील श्रावणातील संकल्प याच श्रावणात पूर्णत्वास नेत केवळ मंदिराची उभारणीच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यात आला.
हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या पारंपरिक स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या भव्य मंदिराला आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप देण्यात आले आहे. त्यामुळे पुरातन महाशिवलिंगाभोवती उभे राहिलेले हे नवे मंदिर श्रद्धा, स्थापत्य आणि पर्यटनाचा अनोखा संगम ठरत आहे. जीर्णोद्धारानंतर प्रथमच मोठ्या भक्तिभावाने धार्मिक विधी पार पडल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
या सोहळ्यास अमृता फडणवीस यांची विशेष उपस्थिती लाभली. त्या कावड घेऊन मंदिर परिसरात दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत शिवलिंग पूजन, मंत्रोच्चारात महाअभिषेक, महाआरती आणि महाकाल शृंगार दर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेतले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या विनंतीनंतर अमृता फडणवीस यांनी ‘शिवतांडव स्तोत्र’ सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थित भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आज आपण ज्या भूमीवर उभे आहोत, त्या भूमीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. जवळपास ४०० वर्षे जुने हे शिवलिंग वर्षानुवर्षे उघड्यावर होते. ही परिस्थिती आपल्या श्रद्धेला शोभणारी नव्हती. मागील वर्षी अमृता फडणवीस चंद्रपुरात आल्या होत्या. त्यांनी हे शिवलिंग पाहिले आणि ‘भोलेनाथ असे उघड्यावर असणे योग्य नाही; येथे भव्य मंदिर झाले पाहिजे, असे सांगितले. त्यांचे हे शब्द आमच्यासाठी संकल्पाचे शब्द ठरले.
हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या स्थापत्यशैलीवर आधारित या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. हा केवळ दगड, विटा आणि सिमेंटचा प्रकल्प नाही; ही आपल्या श्रद्धेची उभारणी, आपल्या इतिहासाचा सन्मान आणि पुढील पिढ्यांसाठी निर्माण केलेला वारसा आहे. चंद्रपूरला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर आणायचे आहे, हा माझा संकल्प आहे, असे जोरगेवार यांनी स्पष्ट केले.
देशाच्या मध्यभागी चंद्रपूर आहे. प्रत्येकाला बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे देशाच्या मध्यभागातील भाविकांनी या प्राचीन शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपुरात यावे, या उद्देशाने या मंदिराच्या विकासाची संकल्पना पुढे नेण्यात आली आहे. या परिसरात देवी-देवतांच्या वाहनांच्या मूर्ती, वास्तू आणि प्राचीनतेच्या अनेक खुणा आहेत. त्या काळी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली असावी; मात्र काही कारणांमुळे ते पूर्णत्वास जाऊ शकले नाही आणि मंदिर अपूर्ण राहिले, असे त्यांनी सांगितले.
मंदिर उभारणीच्या प्रवासात आलेल्या अडचणींचाही त्यांनी उल्लेख केला. हे काम सुरू केले आणि अडचणी आल्या नाहीत, असे नाही. मंदिर उभे राहत असताना अनेकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. विविध प्रकारे हे काम थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र हे काम थांबले नाही. कारण हे काम केवळ मंदिरासाठी नाही, तर चंद्रपूरच्या श्रद्धेसाठी आणि चंद्रपूरच्या भविष्यासाठी आहे. आज हजारो भाविक येथे येऊ लागले आहेत आणि चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनाची चर्चा सुरू झाली आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आमचे रक्षण होईल, यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ज्या राज्यात धर्म आणि माणूस सुरक्षित आहे, त्या राज्यात चंद्रपूरच्या या प्राचीन शिवलिंगावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असा माझा विश्वास आहे, असेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
अमृता फडणवीस यांनीही या मंदिराच्या उभारणीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “मागील वर्षी मी येथे आले होते आणि पुन्हा यंदाही येथे येण्याचा योग आला. मंदिराचे काम थांबविण्याचे प्रयत्न झाले; मात्र शक्तीपेक्षा श्रद्धा मोठी असते. त्यामुळे हे मंदिर येथे उभे राहिले. शिवतांडव म्हणजेच बदल आणि परिवर्तन. आज कावड घेऊन येथे येण्याचा मला विशेष आनंद झाला. येथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तीचा भाव दिसत आहे. अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाज एकत्र येतो. एखादे काम श्रद्धा आणि सातत्याने केले, तर विषाचेही अमृत होते. असे ते म्हणाल्या.
या भव्य सोहळ्यामुळे लालपेठ-भिवापूर येथील पुरातन महाशिवलिंगाला धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले हे शिवस्थान आता भव्य मंदिर, निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनत आहे. चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देणारे हे शिवस्थान भविष्यात जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावरील प्रमुख धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिर करणार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी येथे तयार होत असलेल्या दोन करोड रुपयांच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.



