पावसाने जरा उसंत घेतल्याने शेतीच्या कामाला वेग
कीटकनाशक - तणनाशक फवारणी व आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संपूर्ण तालुक्यात दोन – तीन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून शेतकरी शेतीच्या कामाला लागलेला आहे. दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना कामे करता आली नाहीत. आता पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने तालुक्यातील शिवारात शेती कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या तणनाशक व किटकनाशक फवारणीला आणि डवरणी , खुरपणी व खते देण्याच्या कामाला वेग आला आहे.
परिसरात गेल्या आठवडा भरापासून संततधार पाऊस सुरु असल्याने खरीप हंगामातील आंतरमशागतीची कामे खोळंबली होती. त्यात सततच्या पावसाने कापूस, सोयाबीनसह अन्य पिके पिवळी पडली. तर शेतात मोठ्या प्रमाणात तण व हिरव्या कचऱ्याला ऊत आला आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने आठवड्यानंतर सुर्यदर्शन झाल्याने शेतकरी सुखावला असून आंतरमशागत करण्यात व्यस्त झाला आहे.
यंदा परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापूस व सोयाबीन पिकाची लागवड व पेरणी केली आहे. पावसामध्ये सातत राहिल्याने पिकांमध्ये तण वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. चार दिवसांपासून परिसरात पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कापूस, तुरी, सोयाबीनची खुरपणी व कोळपणीची लगबग सुरू आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेताकडे फिरकणेही शक्य न झाल्याने उघडीप दिलेल्या पावसामुळे दिवस उजाडला की शेतकरी मशागतीची कामे करीत आहे. योग्य वेळी योग्य ती मशागत झाली तर पिकांची वाढ झपाट्याने होणार आहे. शिवाय सततच्या पावसामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रखडलेली कामे आणि उत्पादनवाढीच्या अनुशंगाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. यातच ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.