अंतरगाव येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली :_ राज्य शासनच्या कृषी विभागामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.०, आणि पाणी फाऊंडेशन, फार्मर कप स्पर्धा व गट शेती अंतर्गत सावली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने अंतरगाव येथे नैसर्गिक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या शाळेत शेतकऱ्यांना विषमुक्त व शाश्वत शेतीचे महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले.
२६ ऑगस्टला बुधवारी झालेल्या या शेती शाळेमध्ये प्रामुख्याने जैविक शेती, पक्षी थांबे,कामगंध सापळे, पिवळे चिकट सापळे, दशपर्णी अर्क इ. विषयांवर सखोल चर्चा व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
धान पीक परिसंस्था निरीक्षण: पिकांची वाढ आणि परिसंस्थेच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन.
हवामान अनुकूल शेती: बदलत्या हवामानानुसार शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्याबाबत जागरूकता.
एकात्मिक कीड व्यवस्थापन: रासायनिक कीटकनाशकांऐवजी दशपर्णी अर्क, निमास्त्र आणि ब्रह्मास्त्र यांच्या वापराचे महत्त्व व बनवण्याची पद्धत.
जिवामृत व जिवाणू संवर्धन:जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवामृताचा वापर.
जैविक व यांत्रिक नियंत्रणे:शेतात पक्षी थांबे, चिकट सापळे आणि कामगंध सापळ्यांचा वापर करण्याचे फायदे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले.
या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी व मार्गदर्शक उपस्थित होते. यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी योगेश टेकाळे, मेंटाॅर अक्षय ठिकरे, आणि नानाजी देशमुख क.षी संजिवनी प्रकल्पाचे समुह सहाय्यक नुपूर फुलबांधे, यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतरगांव येथील शिवछत्रपती पुरुष गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यां मध्ये गट शेतीच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीविषयी मोठी जागरूकता निर्माण होत असून, गट शेतीला अधिक बळ मिळत आहे.



