‘माझं गावच मंदिर शोभलं’ या राष्ट्रसंतांच्या विचारधनातून भद्रावती येथे श्री गुरूदेव आषाढी एकादशी पालखी सोहळा संपन्न
श्रीगुरुदेव संस्कार केंद्र भद्रावतीचा अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्री गुरुदेव संस्कार केंद्र, भद्रावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीगुरुदेव पालखी सोहळ्या’ने संपूर्ण भद्रावती परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
पंढरपूरची आषाढी एकादशी वारी ही भक्ती मार्गातील महायात्रा असून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. प्रांत,भाषा, जात, धर्म, पंथ , संप्रदाय यापलीकडे जाऊन संतांच्या विचारांचा वसा घेऊन मानवोन्नतीची ही भक्तीयात्रा शेकडो वर्षापासून प्रवास करते आहे.
माझं गावच मंदिर शोभलं या वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या विचारधनातुन महाराष्ट्राचं हे सांस्कृतिक वैभव जपण्याचा हा छोटासा प्रयत्न श्रीगुरुदेव संस्कार केंद्र, सुरक्षा नगर येथील विद्यार्थ्यांनी श्रीगुरुदेव आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून करीत आहे.
हा अध्यात्मिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक प्रवास येणाऱ्या पुढील पिढीपर्यंत पोहचुन धर्म, संस्कृती व राष्ट्र निर्माणा करीता ह्या संस्कार वारीचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी श्रीगुरुदेव संस्कार केंद्रातून निघुन हा पालखी सोहळा शहरातील विविध परिसरात या पालखी सोहळ्याचे समारोप करीत आपलं गावच मंदिर करण्याचा ह्या चिमुकल्यांचा संकल्प आहे.
सर्वप्रथम श्री गुरुदेव पादुकांचे पूजन होऊन या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. श्री कन्यका माता मंदिर येथे दर्शन होऊन श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर त्याचप्रमाणे श्री संत गजानन महाराज मंदिर, भद्रनाग मंदिर, भवानी माता मंदिर येथे दर्शन करीत नगरपरिषद येथे पालखीला विसावा देण्यात आला. नगरपरिषद भद्रावती येथे श्री गुरुदेव आषाढी एकादशी पालखीची भव्य स्वागत करण्यात आले . नगरपरिषद भद्रावतीच्या वतीने आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पदन्यास,अभंग त्याचप्रमाणे भारुड सादरीकरणातुन सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
पालखी पुढील प्रवासात श्रीसंत झिंगुजी महाराज मठ यांचे वतीने पालखीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात येऊन पादुकांचे पूजन करण्यात आले . त्यानंतर पालखीसह असंख्य भाविक भक्ती व नामघोषात मार्गक्रमण करीत गुरुनगर येथे प्रवेश करताच गुरुनगर येथील सर्व नगर वासीयांच्या प्रचंड उपस्थितीत पालखीचे अतिशय भव्य- दिव्य स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी संपूर्ण नगरवासीयांनी व नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता.. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या, झेंडा, पताके त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराच्या घरासमोर बॅनर्स लावून श्री गुरुदेव पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. जण प्रति पंढरपूरचे स्वरुप या परिसराला प्राप्त झाले होते.
जि. प. प्राथमिक शाळा चिचोर्डीचे पटांगणात श्रीगुरुदेव पालखीचा भव्य समारोप करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी अभंग गायन, पाऊली-पदन्यास, नृत्यादी कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
याठिकाणी सादर करण्यात आलेला रिंगण सोहळा हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. श्रीगुरुदेव संस्कार केंद्रातील चिमुकल्यांनी पावल्या, भारूड, पदन्यास आणि रिंगण यांचे मनमोहक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच गुरुनगर येथील महिलांनी सादर केलेल्या सुंदर रिंगणाने सोहळ्याची शोभा अधिकच वाढविली व त्यानंतर भगवान पांडुरंग व श्री गुरुदेव यांच्या महाआरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या पालखी सोहळ्यात सुमारे ७०० ते ८०० वारकरी सहभागी झाले होते. सर्व महिला व पुरुषांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसरात जणू पंढरीचेच दर्शन घडत असल्याची अनुभूती उपस्थितांना आली.
“विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषाने संपूर्ण भद्रावती नगरी दुमदुमून गेली. महाआरती नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.



