प. पूज्य सद्गुरु दादाश्री महाराज यांच्या परम पावन सानिध्यात गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ दिमाखात साजरा
सूक्ष्म ध्यान साधना, मंत्रदीक्षा आणि महासत्संगातून हजारो साधकांना लाभली गुरुकृपेची दिव्य अनुभूती

चांदा ब्लास्ट
वर्धा :- प. पूज्य सद्गुरु दादाश्री महाराज यांच्या परम पावन सानिध्यात मातोश्री सभागृह, वर्धा येथे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि दिव्य वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या पावन सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या हजारो साधक-बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुकृपेचा अमूल्य लाभ घेतला. कार्यक्रमाची सुरुवात सूक्ष्म ध्यान साधना शिबिराने झाली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात साधकांनी सामूहिक ध्यान साधना करून अंतर्मनातील शांतता, आत्मिक आनंद आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घेतला. ध्यानामुळे मनाची एकाग्रता, आत्मविश्वास आणि अध्यात्माशी असलेले नाते अधिक दृढ झाल्याची भावना अनेक साधकांनी व्यक्त केली.
यानंतर झालेल्या मंत्रदीक्षा सोहळ्यात असंख्य नवीन साधकांनी प. पूज्य सद्गुरु दादाश्री महाराज यांच्या कृपाशीर्वादाने मंत्रदीक्षा स्वीकारली. गुरुमंत्राचा स्वीकार हा जीवनाला नवी दिशा देणारा आणि आत्मोन्नतीचा प्रारंभ असल्याचे भावनिक वातावरण या सोहळ्यात अनुभवायला मिळाले.
उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या महासत्संगात प. पूज्य सद्गुरु दादाश्री महाराज यांनी गुरु-शिष्य परंपरेचे अनन्यसाधारण महत्त्व, मानव जीवनाचे खरे ध्येय, साधना, सेवा, प्रेम, करुणा, आत्मज्ञान, संस्कार आणि विश्वकल्याण या विषयांवर अत्यंत प्रभावी व हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रत्येक शब्दातून अध्यात्माची गोडी, जीवनातील सकारात्मकता आणि गुरुभक्तीचा संदेश प्रकट होत होता. उपस्थित साधक मंत्रमुग्ध होऊन हे अमृततुल्य मार्गदर्शन ऐकत होते.
संपूर्ण सभागृहात “जय गुरुदेव” च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. साधकांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंद आणि गुरुभक्तीचे तेज स्पष्टपणे दिसून येत होते. अनेकांनी या दिवसाला आपल्या जीवनातील अविस्मरणीय आणि भाग्यशाली क्षण असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सेवाभावी पद्धतीने करण्यात आले होते. विविध विभागांतील स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने सेवा बजावत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. प्रत्येक व्यवस्था सुयोग्यरीत्या पार पडल्याने उपस्थित साधकांनी आयोजनाचे मनापासून कौतुक केले. महासत्संगानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो साधकांनी एकत्रितपणे महाप्रसादाचा लाभ घेत भक्ती, सेवा आणि समतेचा सुंदर संदेश अनुभवला.
गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वाने साधकांच्या जीवनात नवी ऊर्जा, नवचैतन्य आणि आध्यात्मिक प्रेरणा जागवली. सूक्ष्म ध्यान साधना, मंत्रदीक्षा आणि महासत्संगाचा त्रिवेणी संगम प्रत्येक साधकासाठी आत्मपरिवर्तनाचा आणि गुरुकृपेचा अविस्मरणीय सोहळा ठरला. प. पूज्य सद्गुरु दादाश्री महाराज यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झालेला हा गुरुपौर्णिमा उत्सव उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात कायमस्वरूपी स्मरणात राहील, अशी भावना साधकांनी व्यक्त केली.



