सेलू शहरात वाढलेल्या गवतामुळे नागरिकांमध्ये आरोग्याची चिंता
तातडीने तणनाशक फवारणीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी . अविनाश नागदेवे
सतत सुरू असलेल्या पावसामुळे सेलू शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागांमध्ये तसेच रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. यामुळे डास, साप तसेच इतर विषारी कीटकांचा वावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाला नागरिकांनी माहिती देत संपूर्ण शहर परिसरात तातडीने तणनाशक फवारणी व निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यालगतच्या जागा, नाल्यांच्या कडा आणि रिकाम्या भूखंडांवरील वाढलेले गवत त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यात वाढलेल्या गवतामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नगरपंचायतीने कोणतीही विलंब न करता स्वच्छता मोहीम, तणनाशक फवारणी व औषध फवारणी करून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत नागरिकांनी मुख्याधिकारी अग्रवाल साहेब यांच्याकडे लक्ष वेधत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.



