पहलगाम हत्याकांडावर घुग्घुस काँग्रेसचा संताप : गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
२८ निष्पाप बळींना श्रद्धांजली; गृहमंत्री अमित शाह राजीनामा द्या - काँग्रेस

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) | काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील ‘मिनी स्वीटझरलँड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅलीमध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप हिंदू पर्यटकांचा बळी गेला. या भीषण घटनेचा घुग्घुस शहर काँग्रेसतर्फे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
२७ एप्रिल रोजी काँग्रेस कार्यालयासमोरील चौकात निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. यावेळी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘निम का पत्ता कडवा है, पाकिस्तान भडवा है’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
या प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी केंद्र सरकारवर आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली. “देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. परंतु भरदिवसा धर्म विचारून निर्दोष हिंदू नागरिकांची हत्या करण्यात येत असेल तर हे गृहखात्याच्या अपयशाचे मोठे उदाहरण आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “देशाला धार्मिक आधारावर फोडण्याचे षडयंत्र या हत्याकांडातून स्पष्टपणे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संकटाच्या वेळी देशात येऊन थेट काश्मीरला भेट द्यायला हवे होते, परंतु ते बिहारमध्ये प्रचारसभेत व्यस्त राहिले, याचा आम्ही तीव्र निषेध करतो.”
काँग्रेसने पुलवामा नंतरचे हे सर्वात भीषण हत्याकांड असल्याचे नमूद करत केंद्र सरकारने पाकिस्तानवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निषेध आंदोलनात काँग्रेस नेते सैय्यद अनवर, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, जिल्हा महासचिव अलीम शेख, माजी उपसरपंच हनीफ शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, इंटक उपाध्यक्ष शहजाद शेख, एनएसयूआय अध्यक्ष आकाश चिलका, तालुका उपाध्यक्ष सिनू गुडला, शेखर तंगडपल्ली, शेख शमिउद्दीन, बालकिशन कुळसंगे, महिला जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सैय्यद, शहर कार्याध्यक्ष दिप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गाताई पाटील, संध्या मंडल, शिल्पा गोहिल, मंगला उगे, दिपक पेंदोर, देव भंडारी, सुनील पाटील, कुमार रुद्रारप, अरविंद चहांदे, निखिल पुनघंटी, अभिषेक सपडी, कपिल गोगला, सुरज मिश्रा, संदीप कांबळे, दिपक कांबळे, अंकुश सपाटे, रंजित राखुंडे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.