MIDC विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा
२६ मे रोजी गोंडपिपरी येथे आंदोलन ; शेतकरी,शेतमजुरांना उपस्थितीचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिंपरी तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या MIDC प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून “कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही”, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शासनाने दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या अधिसूचनेच्या निषेधार्थ औद्योगिक संघर्ष कृती समिती, गोंडपिपरीच्या वतीने दिनांक २६ मे २०२६ रोज मंगळवारला दुपारी ३.०० वाजता भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
MIDC विरोधातील हा शेतकरी मोर्चा जुनी तहसील कार्यालय, गोंडपिपरी येथून सुरू होऊन उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, युवक व महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित MIDC साठी संपादित करण्यात येणारी जमीन अत्यंत सुपीक असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. उद्योग प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच ग्रामसभा व स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मोर्चाद्वारे २५ फेब्रुवारी २०२६ ची अधिसूचना रद्द करणे, शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याचा निर्णय मागे घेणे आदी प्रमुख मागण्या शासनाकडे करण्यात येणार आहेत. “जमीन आमची – निर्णय आमचा”, “MIDC हटवा – शेती वाचवा”, अशा घोषणा देत शेतकरी संघटित होत असून येत्या आंदोलनाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.



