सीमावादग्रस्त १४ गावांत तेलंगणाची जनगणना थांबवा
महाराष्ट्राकडूनच गणना करा नागरिकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- संपूर्ण मराठी भाषिक असलेल्या जिवती तालुक्यातील सीमावादग्रस्त १४ गावांत तेलंगणा सरकारकडून सुरू झालेली जनगणना तात्काळ थांबवावी आणि या गावांत महाराष्ट्र सरकारकडूनच जनगणना करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर व तहसीलदार जिवती यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ही १४ गावे महाराष्ट्राचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गावांची बोलीभाषा पूर्णपणे मराठी आहे. महाराष्ट्र सरकारकडून या गावांत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असताना, तेलंगणा सरकारकडून जनगणना करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ही गावे महाराष्ट्रात येतात. त्यामुळे जनगणना ही महाराष्ट्र सरकारच्याच अधिकाऱ्यांनी करावी.अशी विनंती या निवेदनातून केली आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास रणवीर, छगन साळवे, बाळू पतंगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



