आष्टी येथे महाराजस्व समाधान शिबीरास प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसुल विभागाशी संबंधित प्रश्नांचे निराकरण करणे, जनतेच्या तक्रारी निकाली काढणे व महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत पंचायत समिती आष्टी येथे आयोजित शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या समाधान शिबिरामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष गृह चौकशी करून जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, भूमिहीन दाखले, उत्पन्न दाखले, घरकूल मंजूर प्रमाणपत्र, पुरवठा विभागातील ई-राशन कार्ड प्रमाणपत्र, संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, आरोग्य विभागाचे आयुष्यमान भारत कार्ड, तसेच कलम १५५ अंतर्गत आदेश आणि कलम १८५ अंतर्गत आपसी वाटणीचे आदेश असे एकूण ११५ दाखले, प्रमाणपत्र, आदेश देण्यात आले.
आष्टी तालुक्यात दिनांक १८ फेब्रुवारी ते १७ एप्रिलपर्यंत एकूण २ हजार २९७ प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. समाधान शिबीर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या नेतृत्वात तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागाने घेण्यात आले. यावेळी तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रविण ठाकरे व गुणवंत नारंगे उपस्थित होते.



