सिंधी समाजाच्या संघर्षामुळे समाजातील कुटूंबाला मिळाला जागेचा मालकी हक्क – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान ; सिंधी विस्थापित व अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप ; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ गेल्या अनेक वर्षापासुन विस्थापित असलेल्या सिंधी समाजातील कुटुंबांना स्वत:चे घर होते. मात्र जागेची मालकी नसल्यामुळे मोठी अडचण होती. समाज बांधवानी यासाठी संघर्ष करुन शासनाकडे मालकी हक्क मिळावे यासाठी प्रयत्न केले. राज्य शासनाने कायदेशिर पुर्तता करुन सिंधी समाज बांधवांना जागेच्या मालकी हक्क देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज ख-या अर्थाने या समाजाला न्याय मिळाला असल्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान टप्पा 1 अंतर्गत सिंधी विस्थापित व अतिक्रमीत असलेल्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, संजय गांधी निराधार योजना समिती ग्रामीणचे अध्यक्ष आशिष कुचेवार, शहरचे सौरभ देशमुख आदी उपस्थित होते.
दयाल नगर येथील कागदपत्राची पुर्तता केलेल्या 42 सिंधी बांधवाना पट्टे वाटप करण्यात आले असून उर्वरीत प्रकरणे लवकरच निकाली काढण्यात येईल. गेल्या अनेक वर्षापासुन वर्धा शहरातील नागरिकांच्या जमीनी फ्री होल्ड करुन राज्य शासनाने अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेले प्रकरण निकाली काढले आहे. तशा प्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. जमीनीचे मालकी हक्क देण्यात आले असल्याचे यावेळी डॉ. पंकज भोयर म्हणाले.
राज्य शासन सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करीत असून शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या अनेक वर्षापासुन 700 रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होते. शासनाने मोठा निर्णय घेऊन 700 रुपयावरुन 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे पुढे बोलतांना डॉ. पंकज भोयर म्हणाले. यावेळी पालकमंत्री भोयर यांच्या हस्ते सिंधी समाजातील 42, अतिक्रमीत असलेल्या 52 लाभार्थ्यांना जागेचे पट्टे व संजय गांधी निराधार योजनेच्या 16 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार संदीप पुंडेकर यांनी केले. संचालन रेणुका रोटकर यांनी केले. कार्यक्रमाला सेलूच्या तहसिलदार शंकुतला पाराजे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसिलदार राम काबंळे, श्री दाबेराव, ग्रामसेवक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



