नशामुक्त समाजासाठी अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभागी व्हा _ पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाचा शुभारंभ ; नशामुक्त चित्रफितीचे लोकार्पण
वर्धा :_ अमली पदार्थाच्या सेवनामुळे शारीरिक, मानसिक दुष्परीनाम होतात. सोबतच यातून गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. त्यामुळे नशामुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभाग नोंदवावा तसेच इतरांना व्यसनापासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले.
अग्निहोत्री कॉलेज परिसरातील शिवशंकर सभागृह येथे अमली पदार्थ जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, मराठी नाट्य दिग्दर्शक हरीष इथापे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, आर्वीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले, पुलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले आदी उपस्थित होते.
अमली पदार्थाच्या आहारी जाऊन शरीराची हाणी करु नये. आपल्याला व समाजाला व्यसनापासून दूर राहण्यासाठी आपण व इतरांना यापासून परावृत्त करावे. अमली पदार्थाचे सेवन करणारे, विक्री करणारे, वाहतुक करणारे, अमल पदार्थ बाळगत असणाऱ्यांची माहिती पोलिस विभागाला द्यावी, असे आवाहनही सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. अमली पदार्थ विरोधी अभियान व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन करुन समाजात चांगला व्यक्ती म्हणुन जगण्याचा अधिकार देणारे अभियान आहे, असेही पुढे बोलतांना सौरभकुमार अग्रवाल म्हणाले.
यावेळी मानसिक रोगतज्ञ डॉ. स्वप्नील अलोने यांनी अंमल पदार्थापासुन शरीरावर होणार दुष्पपरिणाम व मानसिक आरोग्य परिणामाची माहिती दिली. व्यसन हे समस्येचे निराकरण नसून क्षणिक आनंदासाठी कायस्वरुपी आयुष्य उध्वस्त करण्याचे साधन आहे. त्यामुळे व्यक्तींनी व्यसनापासुन दूर राहावे असे आवाहन केले.
गेले 26 वर्ष व्यवसनाच्या आधीन जाऊन आता व्यसनमुक्त झालेले अशोक कारेमोरे यांनी आपले अनुभव कथन करुन व्यसनापासुन कशा प्रकारे आयुष्याचे नुकसान होते याबाबत तसेच इंदिरा गांधी व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक सारीका देशपांडे यांनी सुध्दा व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवर व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
यावेळी वंदना कारखेले यांनी पीपीटीद्वारे अमली पदार्थ कायदा, कायद्यातील शिक्षेची तरतूद, व्यसनाधीन लोकांचे पुनर्वसन याबाबत माहिती दिली. तत्पूवी नशामुक्त चित्रफितीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चित्रफित तयार करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमाला अग्निहोत्री कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



