चैत्र नवरात्र यात्रे निमित्त महाकाली मंदिर परिसरात आ. जोरगेवार यांच्या हस्ते ५१ फूट ध्वजाचे ध्वजारोहण
श्री महाकाली माता महोत्सव समितीचे आयोजन; मातेची चांदीची मूर्तीचे पूजन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चैत्र नवरात्र यात्रे निमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने सकाळी ११ वाजता श्री महाकाली मंदिर परिसरात ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माता महाकालीची चांदीची मूर्ती, रथ आणि पालखीचे विधिवत पूजन करून भक्तांच्या दर्शनासाठी मूर्तीची मंदिर परिसरात स्थापना करण्यात आली.
या कार्यक्रमाला श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, सुनील महाकाले, विश्वस्त श्याम धोपटे, पवन सराफ, प्रसाद जोरगेवार, मिलिंद गंपावार, राजू शास्त्रकार, बलराम डोडाणी, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, वंदना हातगावकर, नगरसेविका अॅड. सारिका संदुरकर, आशा देशमुख, सरला कुरसंगे, ज्योती जिवने, पुष्पा उराडे, शीतल गुरनुले, नगरसेवक रॉबिन बिश्वास, दत्तू गवळी, भालचंद्र दाणव, संजय बुरघाटे, अरुण तिखे, सायली येरणे-तोंडरे, संगीता गुजलकर, लीना साखरकर, निलीमा वनकर, हरमन जोसेफ, ताहिर हुसेन, चंद्रशेखर देशमुख, कल्पना शिंदे, तापोष डे, रुपेश पांडे, मुन्ना जोगी, छाया चवरे, विमल कातकर, सविता ब्राम्हणे, रेशमा पांडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजचा हा दिवस अत्यंत पवित्र, ऊर्जादायी आहे. आपल्या चंद्रपूर शहराची आराध्य देवी असलेल्या श्री महाकाली मातेच्या साक्षीने आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत. हा क्षण केवळ धार्मिक नाही, तर आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि एकतेची जाणीव करून देणारा आहे. आज आपण ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण केले आहे. हा ध्वज आपल्या श्रद्धेचा, आत्मविश्वासाचा आणि अस्मितेचे प्रतीक आहे. तो आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो आणि सर्वांना एकत्र बांधण्याचे कार्य करतो, असेही त्यांनी सांगितले.
आज आपण माता महाकालीची चांदीची मूर्ती, रथ आणि पालखीचे विधिवत पूजन केले आणि भक्तांच्या दर्शनासाठी मूर्तीची मंदिर परिसरात स्थापना केली. हा केवळ धार्मिक विधी नसून, आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे. माता महाकालीच्या मूर्तीची स्थापना आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना आहे. अशा पवित्र सोहळ्यांमुळे आपल्या समाजात भक्तीभाव वाढतो आणि एकतेची भावना अधिक दृढ होते असे ते म्हणाले.
श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या माध्यमातून हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमामागचा उद्देश केवळ उत्सव साजरा करणे नसून आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, चंद्रपूरची ओळख विविधतेत एकता अशी आहे. येथे सर्व धर्म, जाती आणि समाजातील लोक बंधुभावाने एकत्र राहतात. अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजातील ऐक्य अधिक दृढ होते. चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या जतनासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत, महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठीही मोठा निधी मंजूर करण्यात आला असून, येथील विकासकामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चैत्र नवरात्र यात्रेनिमित्त राज्यभरातून चंद्रपूरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली असून, प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवला जात असल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.



