संत भक्तीचा आदर्श नमुना! वझर आघावकरांकडून २८ लाखांची देणगी भगवान गडावरील ज्ञानेश्वर मंदिरासाठी अर्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
लोणार :_ तालुक्यातील वझर आघाव येथे मागील वर्षी संत भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त आयोजित तपोपुर्ती सप्ताह सोहळा अत्यंत भक्तीभावात पार पडला. सप्ताह काळात कीर्तन, प्रवचन, हरिनाम सप्ताह, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावासह परिसरातील हजारो भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेत आध्यात्मिक वातावरण अनुभवले.
या कार्यक्रमास न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री, महंत, श्री क्षेत्र भगवान गड यांनी सदिच्छा भेट दिली. आपल्या प्रवचनातून त्यांनी संत परंपरेचे महत्त्व, समाजातील नैतिक मूल्ये आणि धार्मिक कार्यात लोकसहभागाची गरज यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे सप्ताह सोहळ्याला विशेष आध्यात्मिक उंची लाभली.
याच वेळी वझर आघाव येथील भाविकांनी भगवान गडावर उभारण्यात येत असलेल्या महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भव्य मंदिरासाठी आर्थिक सहकार्य जाहीर केले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि भगवान गडावर भव्य मंदिर उभे राहावे, या श्रद्धेने ग्रामस्थांनी एकत्र येत देणगी संकलनाचा संकल्प केला.
२८ लाखांची रक्कम सुपूर्द
जाहीर केल्यानुसार वझर आघाव येथील भाविकांनी तब्बल २८ लाख रुपयांची रक्कम एकत्रित जमा केली. ग्रामस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही रक्कम अधिकृतरित्या महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या सुपूर्द करण्यात आली. या वेळी ग्रामस्थ, सप्ताह समिती सदस्य आणि अनेक भाविक उपस्थित होते.
मंदिर उभारणीला मिळाले नवे बळ
भगवान गडावर निर्माणाधीन ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर वारकरी संप्रदायासाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. मंदिर उभारणीमुळे भाविकांना दर्शन, ध्यान व साधनेसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच संत विचारांचे संवर्धन आणि आध्यात्मिक उपक्रमांना चालना मिळणार आहे.
एकजुटीचा प्रेरणादायी संदेश
वझर आघाव ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट आणि भक्तीभाव हे समाजासाठी आदर्श उदाहरण ठरले आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ श्रद्धेने दिलेली ही देणगी धार्मिक कार्यासाठी लोकसहभाग किती प्रभावी ठरू शकतो, याचे द्योतक आहे.
महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानत मंदिर उभारणीचे कार्य पारदर्शकपणे आणि लवकर पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला. वझर आघावच्या भाविकांची ही उदार देणगी भगवान गडाच्या विकासात आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांच्या प्रसारात निश्चितच मोलाची भूमिका बजावणार आहे.



