वर्तमान पिढीने छत्रपती शिवरायांच्या चरित्रग्रंथांचे पारायण करावे – हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – छत्रपती शिवाजी महाराज हे महान युगपुरुष होते, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनाच केली नाही तर या स्वराज्याला अखंड व शक्तिशाली बनविण्यासाठी महाराजांनी गडकिल्ले, दुर्ग व भक्कम अशा आरमाराची उभारणी करून शत्रूंचा नायनाट करण्याचे धोरण स्वीकारले होते. रयतेच्या कल्याणासाठी अतिशय दक्षपणे कार्य केल्याने ते रयतेचे महान राजे ठरले. शिवरायांची शौर्यगाथा, त्यांनी गाजवलेला पराक्रम, धर्म रक्षणाचे अभूतपूर्व कार्य, सण, उत्सव व धार्मिक संस्काराला विशेष महत्व देणारे ते राजे होते त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या शौर्य व कार्याच्या इतिहासाची पाने देशातील प्रत्येकांने उघडून त्यांच्या चरित्रग्रंथांचे पारायण करावे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल असे विचार पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर महानगरातील छत्रपती शिवाजी महाराज चैकातील स्मारक स्थळी व्हाईस आॅफ श्री. छत्रपती टायगर बहूउद्देशीय संस्था व कमल स्पोर्टींग क्लब चंद्रपूर च्या वतीने दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी ९ वाजता आयोजित माल्यार्पण व अभिवादन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आ. किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमास भाजपा जेष्ठ नेते विजय राऊत, माजी उप महापौर अनिल फुलझेले, कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर, नगरसेवक चंद्रशेखर शेट्टी, सुभाष कासनगोट्टूवार, जितेश कुळमेथे, राॅबिन बिश्वास, भालचंद्र दानव, नगरसेविका पुष्पा उराडे, शितल गुरनुले, आशा देशमुख, सारिका संदुरकर, रवींद्र गुरनुले, प्रकाश देवतळे, बलराम डोडानी, तुषार सोम, प्रमोद शास्त्रकार, राजू घरोटे, विकास खटी, दिनकर सोमलकर, राजू येले, आशिष मासिरकर, वंदना हातगावकर, स्वप्नील डुकरे, पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवभक्त नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा व त्यांनी स्वराज्य रक्षण व रयतेच्या उत्कर्षाकरिता केलेल्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या या कार्यातून वर्तमान पिढीने स्फूर्ती घ्यावी असे आवाहन केले. यावेळी सर्व उपस्थितांनी महाराजांच्या सिंहासनाधिष्टित प्रतिमेस माल्यार्पण करून महाराजांच्या स्मृतीस वंदन केले.



