नांदा येथे ‘बोल बम’ च्या जयघोषाने कावड यात्रा संपन्न
श्रीराम जन्मोत्सव समितीचे आयोजन ; मुसळधार पावसातही महिलांनी मोठ्या उल्लासाने घेतला सहभाग
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महाराष्ट्रातील श्रावण महिना सुरू झाला नसला तरी उत्तर भारतातील अनेक प्रांतातील लोकांचा श्रावण महिना सुरू झाले आहे. हिंदू धर्मात श्रावण महिना जप, तपश्चर्या आणि उपवासाचा महिना मानला जातो. श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कावड यात्रेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन श्रीराम जन्मोत्सव समितीने नांदाफाटा येथे कावड यात्रा काढली.
नांदा येथील श्रीराम मंदिरात शिव मंदिराचे पंडित पंकज पांडे यांच्या द्वारे पैनगंगा नदी सांगोडा येथून आणलेल्या पाण्यात गंगाजल टाकुन पूर्ण धार्मिक रीति पद्धतिने पूजा करून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली. सर्व कावडींनी गंगाजल भरलेली कावड आणि ‘ बम बम भोले, बोल बम ‘ चा जय घोष म्हणत बैंडबाजा वाजवत प्रवासाला सुरुवात केली. या रॅलीत मुसळधार पाऊस असूनही मोठ्या संख्येने महिलांनीही यात्रेत नाचत, भजन गात सहभाग घेतला. पावसाळ्याच्या रिमझिम सरींनी चिंब झालेल्या या कावड यात्रेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि बम बम भोलेचा जयघोष करत दिसले. सर्व कावडींनी शिवमंदिरात पोहोचून शिवलिंगावर जल अर्पण करून महादेवाला प्रसन्न करत त्यांचा विशेष आशीर्वाद घेतला. रॅलीत उपस्थित सर्व लोकांना चनापुरीचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपचे युवा नेते नीलेश ताजणे, शेतकरी संघटनेचे रत्नाकर चटप, कांग्रेसचे अभय मुनोत सोबतच नितेश मालेकर, नवनाथ ठाकरे, मनोज बोढाले, हरिदास पाचभाई, मुरलीधर बोडखे, प्रतीक सदनपवार, रवी बंडीवार, आकाश बोंगिरवार, राजू मोहितकर आदींसह अनेक नागरिक उपास्थित उपस्थित होते.
या कावड यात्रेत सुघर पंडित, बलवंतसिंग चौहान, गुप्ता सर, सुमेंद्र ठाकूर, गिरीश बोगावार, बालेश्वर प्रसाद, विनोद साहू, प्रदीप तिवारी, उमेश सोनी, सौरभ दास, रवींद्र वर्मा, राजेश सिंग, नथनी सदा यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष, महिला आणि तरुण युवा मंडळी आपल्या हाथानी स्वतः बनवून सजवलेली कावड घेऊन सहभागी झाले होते.