वृक्षारोपणासोबत वृक्ष जगविण्याची गरज :विभाग नियंत्रक सुतावणे
रापमच्या विभागीय कार्यालयात वृक्षारोपण
चांदा ब्लास्ट :
चंद्रपूर : माणसांच्या कृतीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण महत्वाचे आहे. परंतु, त्यासोबतच लावलेले रोपटे जगविणे सुद्धा तेवढेच आवश्यक असल्याचे मत राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे यांनी व्यक्त केले. रापमच्या तुकूम येथील विभागीय कार्यालयात महानगरपालिका, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती व रापमच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
रापमच्या विभागीय कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे यांची उपस्थिती होती. यावेळी विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा, महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख एस. बिराजदार, मनपाचे अभियंता हजारे, चावरे, विभागीय अधिकारी पुन्नमवार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सुतावणे यांनी चंद्रपूरचे प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे सांगून ही एक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्ती केली. डॉ. गोपाल मुंधडा यांनी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या समाजपयोगी उपक्रमांचा आढावा घेत अशा प्रकारच्या कार्यक्रमांना संस्थेचे सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. यापुढे चंद्रपूर बचाव संघर्ष समिती व रापमच्या संयुक्त विद्यमाने अनेक उपक्रम राबविण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात रापम, मनपाचे अधिकारी व कर्मचारी आणि चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी मनपातर्फे वृक्षारोपण मोहीम राबविली जात असून, विविध स्पर्धांचे माध्यमातून जनजागृती व्यापक प्रमाणात केली जात असल्याचे सांगितले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम रापमच्या यांत्रिकी विभागाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी वड, पिंपळ यासारख्या २५ रोपट्यांचे रोपण करण्यात आले. हे रोपटे जगविण्याची जबाबदारी रापमतील प्रशिक्षणार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेकॅनिकल विभागाचे प्रमुख बिराजदार यांनी करताना जागतिक स्तरावर प्रदूषण कसे वाढत आहे, याचे दाखले दिले. अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती याप्रसंगी देत चंद्रपूरचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन लता जोगे व आभार रमेश ददगाळ यांनी मानले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत सीबीएसएसचे पदाधिकारी उपस्थित होते