ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इसापुर व सातनाला धरणातून पाण्याचा विसर्ग ; कोरपण्यात पूर परिस्थिती 

पैनगंगा व वर्धा नदीला ही पूर ; अनेक मार्ग बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – यवतमाळ व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसद तालुक्यातील इसापूर चे १३ पैकी नऊ व जैनत मंडल तील सातनाला धरणाचे चार पैकी तीन दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. परिणामी यवतमाळ, आदिलाबाद जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, चंद्रपूर तालुक्यातील पैनगंगा व वर्धा नदीच्या काठावरील गावाच्या शिवेवर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाणी पातळीत अधिक वाढ होत असल्याने नदी काठच्या गावात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे.

धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्र दोन्ही थडीच्या काठोकाठ भरून गावाच्या वेशीवर शिरण्यास सुरुवात झाली आहे. यातच शेत शिवार, पूल रस्ते पाण्याखाली आले आहे.

यावर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर – कोरपना तालुक्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील धानोरा – भोयगाव मार्गावरील शनिवारी सायंकाळी नऊ वाजता च्या सुमारास पूलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प पडली आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील कोडशी बूज – कोरपना, कोडशी बूज – कोडशी खु मार्ग तर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारे गांधीनगर – तेजापूर, जेवरा – गाडेघाट, पिपरी – मूर्ती, परसोडा – पीपरड, कोडशी बूज – देऊरवाडा आदी मार्ग मध्य रात्रीपासून पूर्णतः बंद पडले आहे. महसूल व पोलीस प्रशासनाकडून सदर मार्ग खबरदारी म्हणून बॅरिकेट लावून वाहतुकीसाठी बंद केले आहे. पैनगंगा नदीतील जल स्तर वाढत असल्याने नदी काठावरील गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच वनसडी – भोयगाव सह अनेक मार्ग नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे.

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

कोरपना तालुक्यातील परसोडा, रायपूर, कोठोडा बूज, मेहंदी, पारडी, अकोला, भोईगुडा, जेवरा, तुळशी, गांधीनगर, कोडशी बूज, कोडशी खू, पिपरी, वनोजा, अंतरगाव, सांगोडा, कारवाई, विरुर, इरई, भारोसा, भोयगाव आदी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुराच्या पाण्याने बुडाले शेत शिवार

पाण्याची पातळी वाढून बाहेर फेकली जात असल्याने पुराचे पाणी शेतशिवारात आले आहे. यातच कापूस, सोयाबीन, तूर आदी लागवडीखालील पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये