सुनील बावणे (नील) काव्यगौरव पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : वैशाख वादळ वारा काव्य महोत्सव – २०२५ ग्रामीण कवी चंद्रकांत मोतीराम जोगदंड आयोजित भव्य खुले कविसंमेलन व पुरस्कार सोहळा दि. ८ जून रोजी एस. एम. जोशी फाऊंडेशन सभागृह, पुणे येथे संपन्न झाला. या सोहळ्यात चंद्रपूर येथील सुप्रसिद्ध गझलकार सुनील बावणे यांच्या “स्याडा कोठसा भरते” या बोलीभाषेतील काव्यसंग्रहास सुरेश रामलिंग मिटकरी स्मृती उत्कृष्ट काव्य संग्रह काव्यगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मान. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
या आधीही त्यांच्या “स्याडा कोठसा भरते” या साहित्य कृतीला ललित कला फाउंडेशन ठाणे चा साहित्य पुष्प पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. बल्लारपूर येथील पेपर मिल मध्ये कार्यरत असलेले गझलकार सुनील बावणे यांनी अनेक प्रकारात साहित्य लिखाण केले आहे. तसेच विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेले आहे. नुकताच प्रकाशित झालेला हा त्यांचा पहिलाच काव्य संग्रह महाराष्ट्रभर चर्चिला जात आहे. आणि अशातच पुणे येथील प्रतिष्ठित संस्थेचा काव्यगौरव हा पुरस्कार त्यांना मिळाला ही बाब चंद्रपूर वासियांसाठी अतिशय अभिमानाची असून साहित्य क्षेत्र व त्यांच्या रसिक श्रोत्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
वैशाख वादळ वारा काव्य महोत्सव या महोत्सवाचे आयोजन ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड हे दरवर्षी करीत असतात. या वर्षी सुद्धा त्यांनी काव्य महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटन मान. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले, अध्यक्षस्थानी शैलेंद्र भणगे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बबन पोतदार, सूर्यकांत तिवडे, प्रतिभा काळे, शिवाजी शिंदे, चंद्रकांत जोगदंड व आदी मान्यवरांची मोठ्या संस्थेने उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गझलकार सुनील बावणे यांना काव्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. काव्यवाचन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे संचलन कवी जयदीप वनशिंग व कवी सिताराम नरके यांनी केले.