ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर प्रहारचे प्रफुल तुम्मे यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला यश

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

        सावली मुख्यालयापासून १५ किलोमीटर वर असलेल्या पाथरी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सावली तालुका अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत पाथरीचे उपसरपंच प्रफुल तुम्मे यांनी घेतलेला बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय अखेर यशस्वी ठरला आहे. मागण्या मान्य झाल्याने सात दिवसांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

१० जूनपासून सुरू झालेल्या या आंदोलनामागे पाथरी, सिंदेवाही व सावली या मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. मौजा पाथरी हे इंग्रजकालीन काळातील मध्यवर्ती गाव असून, येथे सचिवालय असूनही मूलभूत सुविधा अपूर्ण आहेत. शासनाने याठिकाणी नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्याचे धोरण जाहीर केले होते, परंतु प्रत्यक्षात नियुक्ती झालेली नव्हती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तालुक्याच्या गावी वारंवार जावे लागत होते.

तसेच, इंग्रजकालीन आसोला-मेंढा तलावाच्या विकासासाठी पर्यटन प्रकल्प राबविण्याची मागणी, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका, जिल्हा परिषद शाळेत शिक्षक भरती, निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना वेळेवर मानधन देण्याबाबत अनेकदा निवेदने देऊनही कार्यवाही झाली नव्हती.

या सगळ्या मागण्यांसाठी प्रफुल तुम्मे यांनी थेट अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग पत्करला. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. अखेर, तहसीलदार प्रांजली चिरडे आणि अन्य प्रशासनिक अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी ठरले आणि उपोषण मागे घेण्यात आले.

या आंदोलनामुळे पाथरी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रफुल तुम्मे यांच्या संघर्षशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये