पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा
शिवसेनेची निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा अडकला असून त्यामुळे पाणी तुंबण्याची व जलस्रोत प्रदूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच शहरातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यामुळे काही झाडे पडण्याच्या स्थितीत असून नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते व शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या मार्गदर्शनात व शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात नगर परिषद भद्रावती मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नाल्यांची तातडीने सफाई करून पाणी तुंबण्याची शक्यता दूर करावी, वादळामुळे धोकादायक झालेली झाडे शहानिशा करून कापावीत, मच्छरांच्या उत्पत्तीमुळे होणाऱ्या रोगांपासून बचावासाठी संपूर्ण शहरात कीटकनाशक फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या सकारात्मक पुढाकाराची दखल घेत मुख्याधिकारी यांनी तातडीने संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच नाल्यांची सफाई, धोकादायक झाडांची छाटणी व मच्छर निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
*नागरिकांत समाधानाची भावना*
या सकारात्मक निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून आगामी पावसाळ्यात संभाव्य संकटांपासून संरक्षण मिळेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. नागरिकांच्या समस्या वेळीच लक्षात घेऊन प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करणे ही शिवसेना ची बांधिलकी आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी शिवसैनिक शिवसैनिक सुमित हस्तक, उपतालुकाप्रमुख सिंगलदीप पेंदाम, उपशहर प्रमुख मनीष बुच्चे, शिवसैनिक दीप गारघाटे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.