ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या मोठी असून यादृष्टीने उपाययोजना म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाकरीता विशेषबाब म्हणून विज जोडणी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाला विद्युत जोडणी मिळण्यामध्ये येत असलेल्या अडचणी संदर्भात भाजपा किसान मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री बंडू मधुकर गौरकर यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन समस्या मांडली होती. त्या अनुषंगाने आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना समस्या अवगत करीत मागणी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील कृषी पंपाला विद्युत जोडणी मिळण्याकरिता आवेदन केले असून डिमांडचा भरणा केलेला आहे. परंतु त्यांना अजुनपर्यंत विद्युत जोडणी करुन मिळालेली नाही. ‘बळीराजा कृषी विज माफी योजना’ लागू झाल्यापासून शेतकऱ्यांना कृषी पंप विद्युत जोडणी देणे बंद करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जमीनीची पाण्याची पातळी १५० फुटापर्यंत आहे. त्यामुळे सौरपंप उपयोगी पडणार नसल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेषबाब म्हणून कृषी विज जोडणी करुन देण्याची विनंती निवेदनामार्फत केली आहे. त्याअनुषंगाने याबाबत योग्य कार्यवाहीसाठी संबंधिताना आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी पंपाच्या विद्युत जोडणीसाठी भरलेल्या डिमांडबाबत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी देखील मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये