चातुर्मासानिमित्त जैन साध्वींचे चंद्रपूर येथे महाआगमन – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथुन केला पायी प्रवास
चार महिने राहणार शहरात वास्तव्य - समाजाला देणार भक्तिमार्गाचा संदेश
चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी
जितेंद्र चोरडिया चंद्रपूर
चातुर्मास हिंदु तसेच जैन धर्मात अत्यंत महत्त्वाचा काळ. व्रत वैकल्ये, भक्ती, उत्सव आयोजनाचा हा काळ. जैन धर्मात तर चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ह्या काळात धार्मिक विधी तसेच आहार विहराचे विशिष्ठ नियम आवर्जुन पाळले जातात. आजच्या आधुनिक काळात हे नियम हिंदु धर्मियांनी बहुतांश प्रमाणात कालबाह्य ठरवले असले तरीही जैन धर्मीय मात्र ह्या कालावधीत धार्मिक परंपरेने ठरवून दिलेले नियम अगदी काटेकोरपणे पाळतात. ह्या कालावधीत विविध धार्मिक अनुष्ठानांसह आहाराच्या नियमांचे पालन केले जाते. आयुर्वेद तसेच शरीर शास्त्रांचे नियम बघितले तर ह्या काळात मनुष्याने काय ग्रहण करावे व कुठल्या खाद्य पदार्थांचा त्याग करावा हे स्पष्टपणे सांगितले आहे. ह्या काळात वातावरणानुसार आरोग्यदृष्ट्या कुठले खाद्य सेवन करणे हानिकारक आहे ते स्पष्ट करण्यात आले असुन जैन धर्मीय हेच शास्त्र धार्मिक मान्यतेनुसार पाळुन आपले आरोग्य जपतात हे विशेष.
चातुर्मास काळात आपल्या अनुयायांना विशेष धार्मिक मार्गदर्शन तसेच विविध अनुष्ठान करून त्यांच्यातील धार्मिक व सेवाभाव वृद्धिंगत करण्याचा उद्देशाने छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूर येथुन परम पूज्य जयशीशु विरतियशा मा.सा तथा प.पू. विनम्रयशाश्री मा.सा आदि ठाणा ०२ ह्या साध्वींचे चंद्रपूर महानगरात पायी प्रवास करून मंगल आगमन झाले. पुढील चार महिन्यात परम पूज्य जयशीशु विरतियशा मा.सा तथा प.पू. विनम्रयशाश्री मा.सा आदि ठाणा ०२ ह्या चंद्रपूर येथिल सराफा बाजारात असलेल्या जैन मंदिरात वास्तव्यास राहणार आहेत.
चंद्रपूर महानगरात दोन्ही गुरु महाराजांच्या आगमन व प्रवेश प्रसंगी मंगल दर्शन प्राप्त करण्याकरिता छत्तीसगड राज्यातील रायपूर व दुर्ग, राजस्थान, नागपूर, व इतर ठिकाणचे भाविक उपस्थित होते. शहरात गुरु महाराजांचे महाआगमन पुगलीया नगर येथे झाले तिथून त्यांनी जटपुरा गेट मार्गे सराफा बाजारातील जैन मंदिराकडे प्रस्थान केले ह्यावेळी सकल जैन समाजाच्या महिला, पुरुष व लहान मुलांनी दोन्ही साध्वींचे पारंपरिक वेशात एकत्र येऊन जल्लोषात स्वागत केले.
2 जुलै पासून सुरू होणाऱ्या चातुर्मासानिमित्त जैन मंदिरात रोज सकाळी 9 वाजेपासून प्रवचन होणार असुन सर्व भाविकांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन चातुर्मास समिती चे अध्यक्ष अमित पुगलिया यांनी केले. ह्या प्रसंगी जैन मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष निर्दोष बाबू पुगलिया, स्थानक वासी श्रावक संघांचे अध्यक्ष योगेश भंडारी, जैन सेवा समितीचे अध्यक्ष राज पुगलिया, राजा बाबू कोठारी, संदीप बांठीया, जितेंद्र चोरडिया, गौतम कोठारी, राजेश डागा, रवींद्र बैद, रोहित पुगलिया, तुषार डगली, जितेंद्र मेहेर, नरेश तालेला, अभय ओसवाल, दीपक पारख, सुरेंद्र खंजाची, शकुंतला बांठीया, सुधा सिंघवी, सरिता चोरडिया, कविता डागा, निशा पुगलिया, नेहा बैद, उपस्थित होते.