त्र्यंबक नगर मधील अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील त्र्यंबक नगर मध्ये नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना रहदारी करण्यास अडथळा निर्माण झाला असल्याने त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे पाटील यांनी पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरातील त्रिंबक नगर मध्ये नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी बदलण्याचे काम करण्यात आले आले आहे. जलवाहिनी बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. रस्ते मधोमध खोदले असून अनेक दिवसापासून दुरुस्ती केली नाही. त्यामुळे रस्त्यावरून पायी चालणेही अवघड झाले आहे. परिणामी स्थानिक रहिवासी नागरिकांना, वाहनधारकांना रहदारी करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लहान मोठे अपघात घडत आहे. रस्ते सुस्थितीत नसल्याने विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक रुग्ण, वाहनधारक यांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा जलवाहिन्या टाकून अनेक महिने उलटली तरी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याचे आणि रस्त्याची सुधारणा करण्याचे काम अद्यापही करण्यात आलेली नाही. रस्ते खोदल्यानंतर त्यांची दुरुस्ती करणे याची जबाबदारी कांत्राटदाराची आहे. मात्र रस्ते खोदून पाईपलाईन टाकल्यानंतरही ते तसेच ठेवण्यात आले आहे. अशी परिस्थिती शहरात इतर भागात देखील आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जलवाहिनी टाकण्यासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी. निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड यांच्या स्वाक्षऱ्या आहे.