कोरपणा /जीवती तालुक्यात हत्तीरोग रुग्णांची संख्येत घट
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
हत्तीरोग हा संक्रमिक क्यूलेक्स प्रकारच्या मादी डास चावल्यास या रोगाचा प्रसार होतो.आणि संक्रमिक डास आपल्यास चावल्यास आपल्या शरीरात हत्तीरोगाची कृमी प्रवेश करते. व सदर कृमी आपल्या लसिकाग्रंथीत जाऊन तिथे त्याची वाढ होते. व शरीराचे लटकते अवयव जसे की हात, पाय, वृषण, स्तन या अवयव मधील लसिका ग्रंथीत जाऊन वाढ होते. व त्या अवयवांना सूज येते.आपल्या शरीरात हत्तीरोगाचे जंतू असून सुद्धा काही लक्षण दिसत नाही. कारण हत्तीरोगाचा अधीशयन काळ हा दीर्घ असतो. काही महिने किंवा काही वर्षा नंतर एकाएकी आपल्या अवयवावर सूज येऊ लागते.
हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या भागात जास्त होतो?
हत्तीरोगाचा प्रसार जास्त दल -दल व धान पट्टी असलेल्या क्षेत्रात जास्त प्रमाणात होतो. कोरपना व जीवती तालुक्यात धानाचे क्षेत्र कमी असल्यामुळे रुग्णांची संख्या ही कमी दिसून येते.
कोरपना व जीवती तालुक्यात हत्तीरोग रुग्णांची संख्या किती आहे?
कोरपना तालुक्यात 225 हत्तीरोग रुग्ण असून सर्व रुग्ण उपचाराखाली आहेत.जीवती तालुक्यात 18 हत्तीरोग रुग्ण असून सर्व रुग्ण उपचाराखाली आहेत.तसेच दोन्ही तालुक्यात हत्तीरोग अंडवृद्धी रुग्णाचे प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्याचा विचार करता कोरपणा /जीवती तालुक्यात रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.
सदर हत्तीरोग रुग्णांना आरोग्य विभागातर्फे MMDP किट पुरविण्यात येते. सदर किट च्या माध्यमातून रुग्ण आपल्या प्रभावित अवयवाची काळजी घेऊ शकतात. सध्या शासन स्तरावरून हत्तीरोग रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र करिता तपासणी व प्रमाणपत्र वितरित केले जात आहे.
हत्तीरोगापासून बचाव करण्यासाठी काय करावे…?
क्यूलेक्स डासाचे पैदास ही घाण पाण्यात होते. तरी सदर पैदास स्थाने नष्ट करणे उदा. ( नाली वाहते करणे, सौचालयाच्या गॅस पाईप ला जाळी बसविणे इ.) रात्री आरोग्य कर्मचारी रक्त तपासणी करण्याकरीता आल्यास रक्त तपासणी करून घेणे. हत्तीरोगाची रक्त तपासणी ही फक्त रात्री होते.
हत्तीरोग कर्मचारी हे त्यांना निवडून दिलेल्या महिन्यानुसार प्रत्येक गावाचे रात्रौ सर्वेक्षण करत असतात. त्या सर्वेक्षणामध्ये आपल्या कोरपणा व जीवती तालुक्यात दूषित रक्त नमुने प्रमाण अत्यल्प आहे. तरी आपण हत्तीरोग प्रभावित क्षेत्रात राहत असल्यामुळे वर्षातून एकदा आपल्या रक्ताची तपासणी करणे गरजेचे आहे.
अंडवृद्धी रुग्णांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांची सदर आजारापासून सुटका होते. तसेच दर आठवड्यात उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबीर होत असते. आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपण या शिबिराचा लाभ घेऊ शकतो. सदर शस्त्रक्रिया ही निशुल्क असते.
समाजात हत्तीरोग विषयी असलेला गैरसमज…
हत्तीरोग हा अनुवांशिक रोग आहे. आमच्या कुटुंबात कोणालाही नाही आणि होणार पण नाही.. परंतु हा रोग अनुवांशिक नसून डासामार्फत होतो व कधीही व कोणत्याही वयोगटात होऊ शकतो.
समाजात आणखी काही रुग्ण असू शकतात. जे आरोग्य विभागाच्या यादीत नसू शकतात. तर त्यांनी हत्तीरोग विभागातील कर्मचारी, आशा वर्कर, व इतर आरोग्य कर्मचारी शी संपर्क साधून उपचाराखाली यावे असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, हत्तीरोग अधिकारी डॉ. अशोक जाधव व संपूर्ण हत्तीरोग विभाग यांच्या कडून करण्यात येत आहे.