ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहित्यिकांनी ठाम भूमिका घेणे गरजेचे – प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे

श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

व्यवस्थेविरुद्ध आणि सामाजिक समस्यांविषयी साहित्यिकांनी सजग व ठाम भूमिकेत असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एकनाथ भालेराव, पत्रकार मुन्ना ठाकूर, दयासिंग बावरे, प्रा विनायक कुलकर्णी यांची अतिथी म्हणून उपस्थिती होती

या संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण कवी डॉ. प्रभाकर शेळके यांनी मराठी भाषेचा गुणगौरव करणारी

“भाषा अनंत युगाची,

भाषा माझी अभिजात

बोली शैलीने जागली,

माय मराठीची ज्योत.”

कविता सादर करून भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ कवी ॲड. डॉ. विजयकुमार कस्तुरे यांनी सुद्धा त्यांची प्रसिद्ध असलेली

त्या तरूच्या सावलीला

चल सखे बोलू जरा

तू नि मी आपल्या मनाची

दालने खोलू जरा

ही कविता सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

कवी सुभाष मगर यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करताना स्त्री भ्रूण हत्येवरील सुंदर अशी कविता

पोटी तुझ्या जन्मा आले

माझा गुन्हा काय

फेकून का देता बाबा

दुधावरची साय

सादर करून अंतर्मुख केले.

कवी प्रा. मधुकर जाधव यांनी सुद्धा

धकधकधकधक संसार गाडी

अनेक अनुभव मागे सोडी

उन्हाळे पावसाळे पाहू या

प्रपंच गाडा ओढू या

ही विडंबनपर कविता सादर करून हास्य पिकविले.

याप्रसंगी डॉ. डी. व्ही. खरात, अंकुश पडघन, जयदीप विघ्ने, विवेक रामपूरकर व रमेश नरोडे यांनी सुद्धा एकापेक्षा एक सरस कविता सादर करून वातावरण प्रसन्न केले. डॉ. बबनराव महामुने यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये कथा व कवितांचे सादरीकरण केले.

उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. सुनंदा कुहिरे हिने केले तर उपस्थितांचे आभार मराठी विभागातील प्रा. सीमा धुळे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये