जिवतीतील प्रवाश्यांना पंधरादिवसा पासून ‘लालपरी’ प्रतीक्षा
खाजगी प्रवासी वाहन धारकांकडून जास्त दराने वाहतूक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती तालुका हा अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, व आदिवासी बहुल भाग असलेला तालुका आहे, या तालुक्यातील अतिदुर्गम अश्या काही गावांना एसटी शिवाय पर्याय नाही, दुर्गम गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी एसटीवरच अवलंबून रहावे लागते, तेथील शेतकऱ्यांना शेतीच्या व छोट्या विक्रेत्यांना बाजार व अन्य शासकीय कार्यालयाच्या कामासाठी शहराच्या ठिकाणी येण्यासाठी एसटी हा एकमेव पर्याय आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून ही सगळी व्यवस्था कोलमडली आहे.
एसटी बंदमुळे या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या विशेषतः त ग्रामीण भागातील विद्यार्थी, नागरिकांची, शेतकऱ्यांची अतोनात परवड होत आहे, काही ठिकाणी छोट्या व्यावसायिकांवरही संक्रात आली आहे. या स्थितीचा फायदा खाजगी वाहतूकदारांनी उचलला असून, प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र राजुरा आगाराचे याकडे डोळेझाक सुरू आहे, त्यामुळे प्रवाश्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात बस कधी सुरू होईल याची प्रवाशी आतुरतेने वाट पाहत आहेत. परणामी प्रवाश्यांना खाजगी वाहनाने जास्त भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे, तालुक्यात प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे राजुरा आगाराने प्रवाश्यांची समस्या लक्षात घ्यावी. व पूर्वीप्रमाणे इतर ग्रामीण भागातील एसटी अद्यापही सुरू न झाल्याने अनेक प्रवासी या सेवेपासून वंचित ठरत आहेत, व खाजगी वाहने दररोज जिवती शहरात दाखल होत असून प्रवासी वाहतूक करतात, परंतु जण सामान्यांची जिवनवाहिनी असणारी लाल परी तालुक्यातील ग्रामीण भागात दाखल होत नसल्याने लोकांकडून नाराजी व्यक्त होत आहे, खाजगी वाहने ही प्रवाशी वर्गाची अडवणूक करत मनाला वाट्टेल ते भाडे आकारत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. खाजगी वाहतूकदार एसटी बंद काळात सर्वच नागरिकांची आर्थिंक पिळवणूक करत आहेत, त्यांच्याकडून एमरजेंन्सी प्रवासासाठी आव्वाच्यासव्वा भाडे वसूल केले जात आहे. ग्रामिण भागातील खेड्यापाड्यातील गरिबांची व जेष्ठ नागरिकांची अडचण व आर्थिक गैरसोय लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राजुरा आगारने बस सेवा पूर्वीप्रमाणे जिवती तालुक्यात सुरू करावी. तसेच खास करून तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवारील चौदा गावे, सेवादासनगर, येल्लापूर, कुंभेझरी, टेकामांडवा,भारी, गडपांढरवणी, लिगंणडोह, अश्या अनेक गावात व येथील मागील एसटी बंदच्या अगोदर च्या शेडूल प्रमाणे बस फेऱ्या सुरू होत्या त्या प्रमाणे बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील प्रवाशी वर्ग करत आहे.