चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवीले ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान
चांदा ब्लास्ट
चांदा पब्लिक स्कूल येथे १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छता ही सेवा हे भारत सरकारने सुरु केलेले एक विशेष अभियान आहे. आपला देश स्वच्छ व आरोग्यदायी ठेवणे हा या अभियानाचा हेतू आहे.
स्वच्छता आपल्या सवयी व संस्कारांमध्ये असायला हवी हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहचविणे हा यामागचा उद्देश आहे. म्हणूनच ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या थीमच्या अंतर्गत प्राचार्या आम्रपाली पडोळे यांच्या मार्गदर्शना खाली शाळेत विविध उपक्रमांची आखणी केल्या गेली.
यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन स्वच्छता अभियानात आपला उत्फूर्त सहभाग दिला. या अभियानात प्रामुख्याने श्रमदान, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, घोषवाक्य लेखन, कविता, निबंध लेखन, स्वच्छता जागरुकता रॅली यांचे आयोजन केल्या गेले.
दि. २६/९/२०२४ ला शाळेतील इयत्ता ६ वी ते 9वी चे विद्यार्थी, स्काऊट गाईड गटातील विद्यार्थी, शिक्षक यांनी स्वच्छतेवर आधारित घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन चांदा पब्लिक स्कूल ते रामनगर या मार्गाने रॅली काढून सर्वांना स्वच्छतेचा संदेश दिला. शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना रस्त्यातील वाहतूकीमुळे कोणताही त्रास होऊ नये याकरीता पी.एस.आय. चंद्रशेखर पेड्डीलवार, वाहतूक विभाग, चंद्रपूर यांचे व टीमचे विशेष सहकार्य लाभले. वाहतूक विभागाने दिलेल्या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापनाने त्यांचे आभार मानले.
‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी, तेव्हाच आपण आपला परिसर, आपले शहर व आपला देश स्वच्छ व स्वस्थ बनवू शकतो’. असे आवाहन प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी सर्वांना केले. संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी शाळेत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांना सहकार्य करुन विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांना यशस्वी करण्याकरिता उपक्रम प्रमुख रोशना हजारे, महेश गौरकार, फहीम शेख, रमेश कोडारी, जास्मीन हकीम, ज्योती बिलोरीया यांनी परिश्रम घेतले.