पुरात वाहून गेल्याने ऑटो रिक्षा चालकाचा मृत्यू
पुराच्या पाण्यातून रिक्षा चालवणे अंगलट आले
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- पुराच्या पाण्यातून ऑटो रिक्षा चालवणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ऑटो रिक्षा पाण्यात वाहून गेली. चंद्रपूर जिल्ह्याचे शेवटचे टोक व महाराष्ट्र – तेलगणा सिमेवरील कोतापल्ली ते शेडवाही मार्गावरील मराठगुडा ते शेडवाही गावादरम्यान असलेल्या पुलावर १ सप्टेंबर च्या रात्री ठीक ८.०० वाजता सदर घटना घडली. त्यावेळी ऑटो रिक्षात दोघे जण होते. क्रिष्णा मारोती जाधव रा. ताडेहातनूर हा गावातील त्याचा मित्र रवी रामा पंधरे ( वय २८) याच्या रिक्षाने मौजा गुडशेला येथील त्याचे सासरे सोपान मोरे यांच्या घरी पत्नी लक्ष्मीबाई हिला घेऊन जाण्यासाठी येत असताना कोतापल्ली ते शेडवाही मार्गे येताना मराठगुडा ते शेडवाही दरम्यान असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना ऑटो रिक्षाचालक रवी पंधरे यांनी रिक्षा पुराच्या पाण्यात टाकली असता पुराचे पाणी अचानक वाढले, रिक्षा पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी दोघेही प्रयत्न करीत असताना पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने रवी पंधरे हा पुरात वाहून गेला व क्रिष्णा मारोती जाधव हा कसाबसा त्यातून बाहेर येऊन जवळच असलेल्या मराठगुड्यात जाऊन नागरिकांना बोलाऊन रवी पंधरे याचा शोध घेतला असता पहाटेच्या ६ वाजता पुलापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर रवी पंधरे हा मेलेल्या अवस्थेत आढलून आला.रवी पंधरे ऑटो रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. संपूर्ण कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. याबाबत जिवती पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.