मुल येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव : ग्रामगीता परिक्षेच्या केंद्र प्रमुखांना प्रमाणपत्र वितरण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
श्रीगुरुदेव बचत गट, ग्रामगीता जीवन विकास परीक्षा तालुका समिती आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मुल तालुक्यातील ग्रामगीता जीवन विकास परीक्षा केंद्र प्रमुखांचा सत्कार तथा इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ नवभारत विद्यालय मुल येथे आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नवभारत विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे यांचे हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून देवनील विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर, मुख्याध्यापक अविनाश जगताप, वसंतराव ताजने, चंद्रशेखर पिदुरकर आदींची यावेळी उपस्थिती होती.
नवभारत विद्यालय येथे आयोजित या कार्यक्रमात सन मार्च २०२४ ला माध्यमिक शालांत परीक्षेत ग्रामीण विभाग गुणवंत विद्यार्थी प्रथम समिक्षा संजय घोगरे, द्वितीय गुंजन कैलास अलोने, तृतीय सरगम अतुल अर्जुनकर, तसेच शहरी विभाग प्रथम- इशान संतोष राचर्लावार, द्वितीय- अनुष्का प्रविण ठावरी, तृतीय- संकेत कोमदेव कोल्हे आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवंत विद्यार्थी ग्रामीण विभाग प्रथम -श्रुती रविंद्र कोटरंगे, द्वितीय- श्रुतिका सुनिल मांदाडे, तृतीय- सोनल संजय मोहुर्ले, शहरी विभाग प्रथम- संस्कृती श्रीकांत मुप्पीडवार, द्वितीय- दीर्घायुषी कर्णवीर भुरशे, तृतीय -अथर्व रविंद्र फरतडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र,गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामगीता जीवन विकास परीक्षांचे केंद्र प्रमुख सचिन बल्लावार, निलेश माथनकर,राजु गेडाम, योगराज वरठी, गणेश मांडवकर, सुखदेव चौथाले, विजय लाडेकर यांना प्रमाणपत्र व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच बेबस चित्रपटात बालकलाकार म्हणून भुमिका केलेल्या हर्ष बोदलकर यालाही गौरविण्यात आले . नवभारत विद्यालयासाठी आयोजन समितीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा यावेळी मुख्याध्यापक अशोक झाडे यांना प्रदान करण्यात आली. तसेच वाढदिवसानिमित्त गुरुदेव सेवक किसनराव वासाडे, प्रेरक व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत बोढेकर आणि कीर्तनकार शरद सहारे महाराज यांचाही आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम.नामदेव पिज्दूरकर, सूत्रसंचालन निलेश माथनकर तर आभारप्रदर्शन किसनराव वासाडे यांनी केले. सामुहिक राष्ट्रवंदना गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.