चांदा पब्लिक स्कूल येथे चिमुकल्यांनी जाणुन घेतले स्वातंत्र्याचे व संस्कृतीचे मोल
चांदा ब्लास्ट
15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले, त्यांची आठवण व योगदान विद्यार्थ्यांच्या मनात रूजावे या उद्देशाने चांदा पब्लिक स्कूल येथील पुर्व प्राथमिक विभागात यु.के.जी. च्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात त्यांनी राष्ट्रीय नायकांची निवड करुन वक्तृत्व सादर करायचे होते.
बहिण भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून एल.के.जी. च्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याची स्पर्धा ठेवण्यात आली. त्यात चिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
तसेच स्वयंपाक घरातील काही वस्तू, पदार्थ व सामग्री विषयी विद्यार्थ्यांना माहिती असावी या उद्देशाने वडिल व मूल यांची सँडविच मेकिंग-फायरलेस कूकींग स्पर्धा घेण्यात आली. पाककलेमध्ये रुची दाखविण्या-या वडिलांचा उत्साह यात पाहण्यासारखा होता.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुणे सुर्या कोठारी, पुजा मिश्रा, मनिषा नागोसे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याकरीता साने गुरुजींच्या बालपणीचा प्रसंग समोर ठेवुन त्यांना प्रोत्साहित केले.
ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका श्वेता मच्छा व रिना शहा यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका मंजुश्री नवरखेले यांनी केले. परिक्षकांच्या हस्ते उत्कृष्ठ विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.