नगरपरिषद कंत्राटी कामगारांनी आम्हास विश्वासात न घेता सुरू केले आंदोलन
विविध कंत्राटदारांनी पत्र परिषदेत केला आरोप
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नगर परिषदेच्या विविध कामांच्या कंत्राटी कामगारांनी किमान वेतनानुसार पगार द्यावा ही मागणी घेऊन बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. या संदर्भात कंत्राटी कामगारांनी आम्हा कंत्राटदारांना कुठलीही सूचना न देता हे आंदोलन सुरू केले असल्याचा आरोप नगरपरिषदेच्या विविध विभागांच्या कंत्रादारांनी पत्र परिषदेत केला.
कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याची कुठलीही तरतूद नसताना त्यांनी या मागणीसाठी केलेले काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर आहेत.घंटागाडी,नाली सफाई,रस्ते सफाई,पाणी पुरवठा, घन कचरा,बगीचा,सार्वजनिक स्वच्छालय या कामावरती १२५ कंत्राटी कामगार काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे ऐन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन वातावरण प्रदूषित होईल आणि त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यातील ही भीती लक्षात घेता आम्ही इतर कामगारांना या विविध कामासाठी अस्थायी स्वरूपाने कामगार सामावून घेतले आहे. दि.३१ मार्च २०२४ ला आमचे कंत्राट संपुष्टात आले परंतु त्यात मुदत वाढ करून हे कंत्राट सुरू आहे. सध्या शासनाकडून आम्हाला या कामाचे पैसे मिळाले नाही. सदर कामावर होणाऱ्या वेतनाचा खर्च स्वतः जवळून करीत आहोत. सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकापेक्षा सन २०२३-२४ च्या कामाचे अंदाजपत्रक कमी रकमेचे आहे. वाढती महागाई लक्षात घेता वाढ पाहिजे असता त्यात १५ ते २० टक्के रकमेत कपात करण्यात आली. विविध कामांचे आर्थिक देयके ७ ते १४ महिन्यापर्यंत मिळाले नाही. आरोग्य विभागाचे सर्व कामे १५ व्या वित्त आयोग निधीतून सुरू आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील हा निधी अजून पर्यंत या नगरपालिकेला प्राप्त झाला नाही. सदर निधी सन २४२४-२५ या आर्थिक वर्षात येणार नाही. अशी प्रशासकीय स्तरावर चर्चा आहे.
आम्ही सर्व कंत्राटदारांनी दि.१ऑगस्ट २०२४ ला मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना भेटून कामाच्या थकीत निधीबाबत पत्र दिले असल्याचे पत्र परिषदेत कंत्राटदारांनी सांगितले. आम्ही सर्व कंत्राटदार भद्रावती येथील रहिवासी असल्याने शहरातील साफसफाई व आरोग्य सांभाळणे ही आमची जबाबदारी आहे असे समजून आम्ही एवढ्या महिन्यांपासून या कामाचा निधी मिळत नसताना देखील तो स्वतःचे जवळून खर्च करीत आहोत. असेही त्यांनी शेवटी पत्र परिषदेत सांगितले.
या पत्र परिषदेत हेमंत आवारी, रुक्साना शेख, रंजना मोडक, प्रदीप गायकवाड, इक्रान पठाण, प्रशांत कामठाणे, सुरेंद्र प्रसाद, राजू भगत हे कंत्राटदार उपस्थित होते.