ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे पुलाच्या कामाने दुचाकी जाण्यापुरताच उरला मार्ग

रेल्वेने तात्पुरता तयार केलेला रस्ताही खचला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

         विजासनमार्गे माजरीकडे जाणाऱ्या रेल्वे फाटकाजवळ रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम रेल्वे कंत्राटदाराने मंदगतीने केल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना रहदारीसाठी नाल्यातून तात्पुरता रस्ता तयार केला. मात्र सततच्या पावसामुळे हा रस्ता खचल्याने या मार्गाने चारचाकी वाहने निघणे कठीण झाल्याने प्रशासनाने चारचाकी वाहने टाकण्यास बंदी घातली आहे.

त्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. रेल्वे कंत्राटदाराने हिवाळा व उन्हाळा या ऋतूत या पुलाचे काम करण्याऐवजी पावसाळ्याच्या तोंडावर नाल्यावरील पुलाचे बांधकाम चालू केले व याच नाल्यातून नागरिकांना जाण्याकरिता पाइपवर माती टाकून कच्चा रस्ता तयार केला. मात्र तो रस्ता सततच्या पाण्यामुळे खचल्याने या मार्गाने जाणाऱ्या चार गावांचा संपर्कासह वेकोली वसाहत व माजरी एरियातील खुल्या कोळसा खाणीकडे जाणाऱ्या वाहनांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा रेल्वे कंत्राट दारावर रोष वाढला आहे.

पुलावरून चारचाकी वाहने टाकण्यावर बंदी

      विजासनजवळील पुलावरील कच्च्या रस्त्याने चारचाकी वाहने जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्कूल बस, सीएमपीडीआय कंपनीची वाहने, एकतानगर वसाहतीतील तसेच खुल्या कोळसा खाणीची वाहने, कुनाडा, चारगाव, माजरी येथील चारचाकी वाहने या मागनि जात असतात. मात्र हा रस्ता खचल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या वाहनावर बंदी घातली आहे.

शेती आली पाण्याखाली

            विजासन रेल्वे पुलाच्या बांधकामामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह काही ठिकाणी थांबल्यामुळे या भागातील सोयाबीन, तूर, कापूस या शेतीत पाणी शिरल्याने संपूर्ण शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रेल्वे कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सततच्या पाण्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. तात्पुरता केलेला रस्ता हा धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे रेल्वे कंत्राटदाराने झालेल्या पुलावरून तात्पुरता मार्ग खुला करून द्यावा, ही मागणी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

अनिल धानोरकर, माजी नगराध्यक्ष, न. प. भद्रावती

रेल्वे पुलाच्या काही भागांतील जमिनीची मोजणी करून रेल्वे ती जमीन रेल्वे प्रशासनाला संपादित कराची आहे. ती जमीन संपादित केल्यावरच आठ महिन्यांत या पुलाचे काम करण्याचा आदेश आहे.

तुसिफ पटेल, व्यवस्थापक, एमआरआयडीसीएल

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये