ओला दुष्काळ घोषणेतून चंद्रपूर जिल्हा वगळला – शेतकरी मदतीपासून वंचित!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश दादाजी चोखारे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट
महायुती सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यांना ओला दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले चंद्रपूर जिल्हा या घोषणेतून वगळला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, घरांची व शेतीमालाची हानी झाली. शेतकरी कर्जबाजारीपणात सापडला असून आर्थिक संकट गडद झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या :
चंद्रपूर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी व तातडीने दिलासा द्यावा.
शेतीपयोगी साधनसामग्री व घरांचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे.
निवेदनाची प्रत कृषीमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी चोखारे यांनी केली आहे.