राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा परिणाम
प्राचार्य अमर कुमार यांची पत्रपरिषद माहिती
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शालेय शिक्षणाच्या माध्यमातून देशाचे भवितव्य उज्वल होऊ शकते.त्याकरिता भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कार्यान्वित केले आहे. त्याची अंमलबजावणी येथील केंद्रीय विद्यालयात करण्यात आली. त्याचे चांगले परिणाम दिसत असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याची माहिती प्राचार्य अमर कुमार यांनी आयोजित पत्र परिषदेत दिली.
या शैक्षणिक धोरणाची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी एनसीईआरटी द्वारा संचालित ‘दीक्षा पोर्टल’ आणि केंद्रीय विद्यालय संघटने द्वारा हे धोरण राबविण्यात येत असल्याचे अमर कुमार यांनी सांगितले. या शैक्षणिक धोरणानुसार सन २०२०-२१ पासून विद्या प्रवेश माड्युल लागू केले. यात पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने खेळ पद्धतीने शिक्षण दिल्या जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यास मदत होते. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषा सोबतच इंग्रजी आणि राष्ट्रभाषा शिकवल्या जाते. त्यात सांकेतिक भाषेचाही समावेश आहे. फाउंडेशन स्टेजसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क नुसार पहिले ते पदवीधर पर्यंतचे चार टप्पे पाडण्यात आले. यात वर्ग १ ते ५, ६ ते ८, ९ ते ११ आणि १२ ते १५ असे आहेत. केंद्र सरकारने विद्यांजली पोर्टल सुरू केले आहे. त्याद्वारे दूरदर्शन, रेडिओ, भ्रमणध्वनी याद्वारे शिक्षण घेता येते या शैक्षणिक धोरणात झालेल्या बदलाचे शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शनाद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना उत्तम वातावरणात शिक्षण घेता यावे म्हणून स्मार्ट क्लासरूम आणि परिसर तयार करण्यात येत असून त्याकरिता केंद्र सरकारकडून निधी दिला जात असल्याचे अमर कुमार यांनी सांगितले. ५ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम-श्री योजना सुरू केली. त्यात आमच्या शाळेची यावर्षी पीएम-श्री शाळा म्हणून निवड झाल्याचे अमर कुमार यांनी शेवटी सांगितले.
यावेळी जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बाळापूरच्या प्राचार्य मीणा मणी,ओ. एफ. हायस्कूल चांदाचे प्राचार्य शिवनंदन तिवारी, केंद्रीय विद्यालयाचे उपप्राचार्य अजय चौकीकर आणि केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश कुऱ्हाडे व शिक्षक उपस्थित होते.