तथागत बुध्दांच्या विचारांची आजच्या काळात गरज : समीर लोणे
घोडपेठ येथील बुध्दपौर्णिमा उत्सव कार्यक्रमात व्यक्त केले मनोगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुध्दांचे तत्वज्ञानच विश्वाला तारू शकते. त्यामुळे बुध्दांच्या विचारांची आजच्या काळात गरज असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती घोडपेठचे अध्यक्ष समीर लोणे यांनी व्यक्त केले. आम्रपाली बौध्द विहार घोडपेठच्या प्रांगणावर सोमवारी आयोजित बुध्दपौर्णिमेच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यातील घोडपेठ येथे बुध्दपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी सकाळी आम्रपाली बौध्द विहार येथे मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदन करून सामूहिक वंदना घेण्यात आली. यावेळी गुरूदेव सेवा मंडळ घोडपेठच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी आम्रपाली बौध्द विहार येथे एकत्र येत अभिवादन केले. सायंकाळी ६ वाजता मी शेवंताबाई बोलतेय या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. लहान बालकांनी या नाटकात भुमिका साकारत नाटकाचे आयोजन केले होते. यावेळी नाटकाच्या संचालिका प्रतिमा जुलमे व कलाकारांचा उत्सव समितीतर्फे स्मृतीचिन्ह देत गौरव करण्यात आला.
सायंकाळी भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती घोडपेठचे उपाध्यक्ष सुनिल गेडाम, सचिव चेतन माहुलकर, सहसचिव विशाल लोणे, संकेत रामटेके, पुर्वांष रंगारी, निशिकांत माहुलकर यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाला गावातील बौध्द समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.