युवकांनी केली अवैध रेती तस्करी करणाऱ्या मजुराची हत्या
येवले ह्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर द्वारे सुरू होती तस्करी - पैसे न मिळाल्याने युवकांनी केली मजुरांना मारहाण?
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
पर्यावरण विभागाची परवानगी न मिळाल्याने जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने जिल्ह्यात अवैध रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकुळ मांडला असुन पोलीस प्रशासन तसेच महासुल विभागाची अर्थपुर्ण डोळेझाक ह्या तस्करीला खतपाणी घालत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी तर ग्रामीण भागातील नदी नाल्यांवर तस्करांनी ठाण मांडले असुन रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे ह्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण देखिल वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राजुरा तालुक्यात देखिल अवैध रेती तस्करांसाठी मोकळे रान उपलब्ध करून दिल्याचे चित्र असुन आज गुरूवार दिनांक 4 जुलै रोजी पहाटे 2:30 वाजताच्या सुमारास अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राजुरा तालुका मुक्यालयापासून अवघ्या 6 किमी अंतरावर असलेल्या धुतला येथील नाल्यातून राजुरा येथिल येवले नामक व्यक्तीच्या ट्रॅक्टर मधुन रेती तस्करी होत होती. दरम्यान 3 जुलैच्या मध्यरात्री येवले ह्यांचा ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करीत असताना धोपटाळा येथील काही युवकांनी ट्रॅक्टर अडविला. मजुर व युवकांची बाचाबाची झाली व ह्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन ट्रॅक्टर वर मजुर म्हणून काम करणाऱ्या मो. शाहनवाज खान पठाण नामक 42 वर्षीय इसमाचा मृत्यु झाला.
अधिक माहिती घेतली असता त्या युवकांनी ट्रॅक्टर अडवून मजुरांकडे 50,000/- रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात येत असुन पैसे न मिळाल्याने त्या युवकांनी मजुरांना दगडांनी मारहाण केली व त्यात एका मजुराचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती कळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठुन प्राथमिक कायदेशीर कारवाई केली व मृत मजुरांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी व जखमी मजुरांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे आणले असुन मजुरांच्या माहितीवरून पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असुन काही आरोपी फरार असल्याचे कळले आहे. ह्या प्रकरणामुळे कुठलीही अनुचित घटना घडु नये ह्यासाठी दंगा नियंत्रक पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात दाखल झाले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.
दरम्यान गौण खनिजाची अवैध तस्करी हे देखिल सदर हत्येचे प्रमुख कारण असल्याने उपजिल्हाधिकारी महसूल हे देखिल दाखल झाले असुन आतातरी अवैध रेती तस्करांच्या मुसक्या पोलीस तसेच महसूल प्रशासन आवळेल का? असा प्रश्न शहरात विचारल्या जात आहे.